विठ्ठल लांडगे
नगर -करोनासारख्या महामारीच्या संकटात जिल्हा शासकीय रुग्णालयास आवश्यक असलेल्या गाऊनच्या टेंडरमध्येही गडबड करण्यात आली आहे. जवळच्या एका ठरविक व्यक्तीलाच ते टेंडर मिळावे, म्हणून स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांचा आटापीटा असल्याचा आरोप अमृतानुभव स्वयंसहायता महिला बचतगटाकडून करण्यात आला आहे.
बचतगटाच्यावतीने अध्यक्ष विजया कुलथे यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे या संदर्भात लेखी स्वरूपात तक्रार केली आहे. त्यात हा गैरकारभार कसा चालतो, या संदर्भात मुद्देसूद व सविस्तर माहिती देखील देण्यात आली आहे. मात्र, करोनाच्या विषाणूच्या उपाययोजनांसाठी सुरू असलेल्या धावपळीत ही गंभीर स्वरूपाची तक्रार देखील अडगळीत पडली असल्याचे सांगितले जाते. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी महिला बचतगटास हे काम देण्यासा सहमती दर्शवून तसे शिफारसपत्रही दिले होते. मात्र, ते पत्रही गायब करण्यात आल्याचा दावा बचतगटातर्फे करण्यात आला आहे.
जिल्हा सरकारी रुग्णालयास डॉक्टर्स, नर्स व वैद्यकीय सेवेतील अन्य कर्मचाऱ्यांसाठी तातडीने गाऊन व मास्कची मोठ्या प्रमाणात गरज असल्याचे समजते. त्यासाठी सरकारी रुग्णालयास अलीकडेच पाच लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. अमृतानुभव बचतगटात साधारण 60 ते 70 गरजू महिला काम करतात. त्यांनी हे काम तातडीने करण्याची तयारी देखील दर्शविली. तथापि, ठराविक व्यक्तीलाच हे टेंडर देण्याचे घाटत असल्याने बचतगटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी जिल्हा सरकारी रुग्णालयात केवळ चकराच मारल्या असल्याचे तक्रार अर्जात स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, अमृतानुभव बचतगटाच्या अध्यक्षा विजया कुलथे यांच्याशी गाऊन व मास्क तयार करण्याच्या कामासंदर्भात अनेक दिवस तेथील वैद्यकीय अधिकारी चर्चा करत होते. मात्र, शेवटी बचतगटाला गाऊन बनविण्याची ऑर्डर देण्याऐवजी एका खासगी व्यक्तिला पाचशे गाऊन बनविण्याची ऑर्डर देण्यात आल्याचे स्पष्टीकरण या अधिकाऱ्याने दिले. विशेष म्हणजे ज्यांना ऑर्डर दिली आहे. त्यांना काम उरकत नाही. तुम्ही बचतगटातर्फे त्यांना मदत करा, असा अजब सल्लाही त्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिल्याचा दावा बचतगटाच्या अध्यक्षा कुलथे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या तक्रारीत केला आहे. त्यामुळे संकटकाळातही केवळ गैरकारभारावरच लक्ष केंद्रीत करणाऱ्या अधिकाऱ्याची तातडीने चौकशी करुन त्यांना तेथून तत्काळ हटवावे, अशी मागणी अमृतानुभव बचतगटाच्या अध्यक्षा विजया कुलथे यांनी केली आहे.
नगर शहर व जिल्ह्यात करोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. अशावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी मास्क व गाऊन शिवून देण्यासंदर्भात आमच्याकडे विचारणा केली होती. आम्ही तयारी दर्शवून अवघ्यात तीनच दिवसांत तब्बल 3000 मास्क बनवून दिले. मात्र, त्यानंतर गाऊन बनविण्याचे काम अन्य कोणाला तरी दिले गेले. राष्ट्रीय संकटात केवळ सामाजिक भावनेतून आम्ही अत्यल्प दरात व दर्जेदार सुविधा देण्यासाठी तयार असताना आम्हाला डावलून एका ठराविक व्यक्तीकडूनच चढ्या भावाने खरेदी करण्याचा घाट घातला. संकट काळात सुद्धा भ्रष्टाचार करण्याची प्रवृत्ती थांबत नाही, याचे वाईट वाटते.
विजया कुलथे,अध्यक्षा, अमृतानुभव महिला बचतगट, नगर.
जिल्हा सरकारी रुग्णालयाकडे आलेली अशी कोणतीही तक्रार माझ्या वाचण्यात आलेली नाही. त्यामुळे ही तक्रार प्राप्त झालेली आहे किंवा नाही, त्याबाबत मला आत्ताच काहीच सांगता येणार नाही. तक्रारीची माहिती घेतल्यानंतर त्यावर बोलता येईल.
डॉ. प्रदीप मुरंबीकर,जिल्हा शल्यचिकित्सक, नगर.