पिंपरी – खून, खुनाचा प्रयत्न, लैंगिक अत्याचार, वाहन चोरी, चोरी, जबरी चोरी अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा वाढता सहभाग चिंतेचा विषय बनत चालला आहे.
गेल्या नऊ महिन्यांत घडलेल्या 110 गुन्ह्यांमध्ये 135 अल्पवयीन मुले आरोपी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. यापैकी बहुतांशजण पोलिसांच्या रेकॉर्डवरील नाहीत. यामुळे पोलिसांची चिंता वाढली आहे.
मी अमुक या वस्तीचा दादा आहे. मला भाई म्हणा, मला दरमहा हप्ता द्या, असे म्हणत ओठावर मिसरूडही न फुटलेली ही कोवळी मुले हातात कोयते, तलवारी घेऊन दहशत निर्माण करत असल्याचे धक्कादायक चित्र शहरात दिसत आहे.
कोणतीही नोकरी-व्यवसाय नसतानाही गळ्यात सोन्याचा गोफ, दिमतीला अलिशाम मोटार, असा रुबाब बाल गुन्हेगारांचा सध्या पहायला मिळतो. घरकुल परिसरात अशाच आक्या बॉन्ड टोळीने दहशत निर्माण केली होती. मात्र ते सज्ञान होताच पोलिसांनी त्यांचा योग्य तो बंदोबस्त केला.
अठरा वर्षाखालील बाल गुन्हेगारांना कठोर शिक्षेची तरतूद नसल्याने संघटीत गुन्हेगारी टोळ्यांकडून कोळ्या मुलांचा चलाखीने वापर करून घेतला जात आहे. यापूर्वी बाल गुन्हेगाराकडून पाकीटमारी, चोरी, घरफोडी अशा गुन्ह्यांमध्ये वापर करून घेतला जात होता. मात्र आता मोठमोठ्या रकमेच्या सुपाऱ्या घेऊन खुनासारख्या गंभीर गुन्ह्यात अल्पवयीन मुलांचा वापर होऊ लागला आहे.
राजकीय आश्रय आणि चिरीमिरीमुळे खरे गुन्हेगार कारवाईपासून लांब राहतात. पोलिसांच्या म्हणण्यानुसार वाढती व्यसनाधीनता, झटपट श्रीमंत होण्याचा हव्यास, चित्रपटातीत गुन्हेगारीचे उदात्तीकरण ही बाल गुन्हेगारीची प्रमुख कारणे आहेत.
मात्र आपला मुलगा कोणाच्या संगतीत राहतो. त्याचे मित्र काय काम करतात, तो रात्री उशिरापर्यंत कोठे असतो, याची माहिती घेणे पालकांची जबाबदारी असते. मात्र मुलगा गुन्हेगारीच्या विळख्यात सापडल्यानंतर पालकांचे डोळे उघडले जातात. मात्र तोपर्यंत फार उशीर झालेला असतो.
गुन्ह्यांमध्ये दोन मुलींचाही सहभाग
एकीकडे अल्पवयीन मुले पोलिसांची डोकेदुखी ठरत आहेत. तर दुसरीकडे वाहन चोरी आणि चोरीच्या गुन्ह्यामध्ये दोन मुलींचा सहभाग असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुलींचे गुन्ह्यामधील प्रमाण हे मुलांच्या तुलनेत अगदी नगण्य असले तरी मुलीही गुन्हेगारी कृत्यात सहभागी होऊ लागल्याने समाज आणि पोलिसांची चिंता वाढली आहे.
अल्पवयीन मुलांचा गुन्ह्यातील सहभाग रोखण्यासाठी समुपदेशन केले जात आहे. एवढेच नव्हे तर शिक्षण थांबलेल्यांना शिक्षण, कोणाला नोकरी तर कोणाला व्यवसायाकरिता मदत केली जात आहे.
– डॉ. सागर कवडे, सहायक पोलीस आयुक्त