पुणे- फसवणूक आणि खंडणी उकळल्या आरोपावरून वानवडी पोलिसात दाखल असलेल्या गुन्ह्यात बडतर्फ पोलीस शैलेश जगताप, परवेझ जमादार, स्वयंघोषित पत्रकार देवेंद्र जैन आणि जयेश जगताप या चौघांना 14 दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी पोलीस कोठडी न देता सर्वांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. त्यानंतर चौघांना जामीन दिला होता.
याविरोधात सरकारी पक्षाने सत्र न्यायालयात अपील केले होते. त्यानुसार अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.पी. पिंगळे यांनी हा आदेश दिला. तसेच, 72 तासाच्या आत चौघांना कॅन्टोन्मेंट न्यायालयात हजर राहण्याचा आदेशही देण्यात आलेला आहे.
या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील राजेश कावेडीया यांनी बाजू मांडली. सोहम उत्तम आढाव (वय 30, रा. वानवडी) याने याबाबत फिर्याद दिली आहे. यातील एक संशियित आरोपी प्रकाश फाले याने एका गिरणी व्यावसायिकास औंधमधील ब्रेमेन चौकाजवळ असलेल्या एका जमिनीचा आपण व्यवहार करत असून त्यामध्ये पैसे गुंतविल्यास दुप्पट नफा होईल, असे आमिष दाखविले.
त्यानंतर त्यांनी व्यावसायिकाकडून 17 लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी वानवडी पोलिसांत फाले कुटुंबीय, जगताप, माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे यांच्यासह 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्यात 28 जुलैला फाले याला न्यायालयात हजर केले असता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्याला एक दिवस पोलिस कोठडी सुनावली. तर उर्वरीत चौघाला हजर केल्यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. या आदेशावर पोलीस आणि सरकारी वकिलांनी सत्र न्यायालयात अपील करीत पुढील तपासासाठी आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती.