पुणे – लॉकडाऊन कालावधीत पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) प्रवासी वाहतूक स्थगित होती. 3 सप्टेंबरपासून वाहतूक सुरू झाली. याला प्रवाशांचादेखील प्रतिसाद मिळत आहे. मागील आठवडाभरात प्रवासी संख्येतदेखील वाढ झाली आहे. मागील तीन दिवस दररोज लाखो नागरिक प्रवास करत आहेत.
करोना पार्श्वभूमीवर मार्चपासून पीएमपीची प्रवासी वाहतूक बंद होती. या कालावधीत केवळ अत्यावश्यक सेवेतील नागरिकांना प्रवासास मुभा होती. अनलॉकच्या अनुषंगाने 3 सप्टेंबरपासून सेवा सुरू झाली.
13 डेपोंतर्गत 190 मार्गांवर 421 बसेसच्या माध्यमातून सेवा देण्यात येत आहे. सध्या 25 टक्के क्षमतेनुसार, सुमारे 1 हजार चालक आणि वाहकांद्वारे बसेसचे संचलन सुरू आहे.
मागील सात दिवसांत सुमारे 2 हजार 750 बसेस धावल्या. याद्वारे 8 लाखांहून अधिक नागरिकांनी प्रवास केला. तर पास विक्रीद्वारेदेखील लाखो रुपयांचे उत्पन्न मिळाले.