मुंबई – भारत आणि पाकिस्तान यांच्यात अनेक दिवसांपासून कोणतीही क्रिकेट मालिका खेळलेली नाही. आता हे दोन संघ आयसीसी स्पर्धा किंवा आशियाई क्रिकेट स्पर्धांमध्ये आमनेसामने येतात. जेव्हा जेव्हा हे दोन संघ भिडतात तेव्हा स्टेडियममधील एकही जागा रिकामी राहत नाही. मात्र, राजकीय कारणांमुळे दोन्ही संघामधील सामने अनेक दिवसांपासून बंद करण्यात आलेले आहेत.
दोन देशांदरम्यान शेवटची क्रिकेट मालिका 2012-13 मध्ये खेळली गेली होती. त्याच वेळी, दोन्ही संघांमधील शेवटचा सामना 2022 टी-20 विश्वचषकादरम्यान खेळला गेला होता. आता पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने दोन्ही देशांमधील क्रिकेट संबंध पूर्ववत होण्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. आफ्रिदीने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटला परवानगी द्यावी, असे आवाहन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केल्याचे समजते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोहा मध्ये लिजेंड्स लीग क्रिकेटच्या निमित्तानं आफ्रिदी म्हणाला- ‘मी पंतप्रधान मोदी साहेबांना विनंती करेन की दोन देशांदरम्यान क्रिकेट होऊ द्या. यंदाच्या आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत, मात्र स्पर्धेचे भवितव्य मैदानाच्या लोकेशनवरून अडकले आहे.
आफ्रिदी म्हणाला- मुख्य समस्या ही आहे की आपण एकत्र बसून बोलत नाही. जसे आपण इथे बसून बोलत आहोत, त्याचप्रमाणे राजकारण्यांनीही एकत्र येऊन बोलावे. त्याच्यावर मोठी जबाबदारी आहे. शाहिद आफ्रिदीच्या नेतृत्वाखालील आशिया लायन्स संघाने यावर्षी लिजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धा जिंकली. अंतिम फेरीत त्यांनी शेन वॉटसनच्या वर्ल्ड जायंट्सचा पराभव केला. गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली भारत महाराजा तिसऱ्या स्थानावर आहे.