पाटणा – ना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना; ना मला आणखी मोठ्या पदांची आकांक्षा आहे. सध्याच्या जबाबदाऱ्या सांभाळताना आम्ही समाधानी आहोत, असे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी सोमवारी म्हटले.
सुमारे आठ महिन्यांपूर्वी बिहारमध्ये मोठ्या राजकीय उलथापालथी घडल्या. नितीश यांच्या जेडीयूने भाजपची साथ सोडली. जेडीयूने सरकार स्थापनेसाठी राजद, कॉंग्रेस आणि इतर पक्षांशी हातमिळवणी केली. त्यावेळी जेडीयू आणि राजदमध्ये एक करार झाल्याची चर्चा सातत्याने रंगत आहे.
नितीश हे तेजस्वी यांच्यासाठी मुख्यमंत्रिपद सोडतील. त्या बदल्यात तेजस्वी हे नितीश यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पाठिंबा देतील, असा तो करार असल्याचे बोलले जाते. मागील काही दिवसांपासून राजद नेत्यांनी तेजस्वी यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री म्हणून करण्याचे सत्र अवलंबले आहे. त्यामुळे जेडीयू आणि राजदमध्ये धुसफूस सुरू झाल्याचे, नितीश आणि तेजस्वी यांच्यात दुरावा आल्याचे अंदाज वर्तवले जाऊ लागले आहेत.
त्या पार्श्वभूमीवर, तेजस्वी यांनी विधानसभेत बोलताना राजकीय अफवांना आवर घालण्याच्या उद्देशातून भूमिका मांडली. नितीश यांचा सर्व फोकस राज्याची सेवा करण्यावर आहे. पंतप्रधान बनण्याची आकांक्षा ते बिल्कूल बाळगून नाहीत. मीही बॉसची (नितीश) जागा घेण्यासाठी अधीर बनलेलो नाही, असे ते म्हणाले.