नवी दिल्ली – “दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे विकासाची दूरदृष्टी असलेले एकमेव नेते असून पंतप्रधान मोदी यांनी सामान्य जनतेच्या हितार्थ आखण्यात येणाऱ्या योजनांसाठी त्यांचा सल्ला घ्यावा” असं वक्तव्य दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनोज सिसोदिया यांनी केले आहे.
दिल्ली येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केलं. यावेळी त्यांनी, सध्या विविध राज्यांमध्ये सुरु असलेल्या निवडणूक प्रचारादरम्यान सर्वच पक्षांनी सत्तेत आल्यास ‘केजरीवाल मॉडेल’ राबविण्याचे आश्वासन दिले असल्याचा दावा देखील केला.
“केजरीवाल हे एकमेव नेते आहेत ज्यांच्याकडे देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेली दूरदृष्टी आहे. त्यांना सामान्य जनतेच्या समस्या, त्यांच्या गरजा यांची जाण असून विकास कसा साधायचा याचे ज्ञान आहे. त्यांच्यामध्ये देशाला योग्य दिशेने घेऊन जाण्याची क्षमता आहे. इतर राजकीय पक्ष आता विकासाच्या ‘केजरीवाल मॉडेल’चे अनुकरण करीत आहेत. अरविंद केजरीवाल जी आश्वासने देतात त्यांचे पालन करतात” असं वक्तव्य सिसोदिया यांनी केलं.
“मला आशा आहे की. पंतप्रधान नरेंद्र मोदी दर १५ दिवसाला अरविंद केजरीवाल यांचा सल्ला घेतील. अरविंद केजरीवाल यांना मोदींनी चहापानासाठी बोलावून त्यांच्याशी देशाच्या विकासासाठी व जनतेच्या कल्याणासाठी कोणत्या योजना राबवाव्या याबाबतची चर्चा करावी.” असं मत देखील सिसोदिया यांनी मांडलं.