कोलकाता – भारतीय फुटबॉलच्या सुवर्णकाळाचे साक्षिदार व देशाचे महान फुटबॉलपटू पी. के. बॅनर्जी यांचे निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. गेले काही दिवस ते न्युमोनियाने त्रस्त होते व त्यांच्यावर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. शुक्रवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांना पार्किन्सन, डीमेन्शिया व हृदयविकाराचाही त्रास होता. गेल्या 2 मार्चपासून ते कृत्रिम श्वसनप्रणालीवर होते.
त्यानंतर भारताचा माजी फुटबॉलपटू बायचंग भुतीया याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याने म्हटले आहे की, “पीके यांच्या निधनाने माझी वैयक्तिक हानी झाली आहे. त्यांच्या केवळ उपस्थितीनेही आम्हाला सरस खेळ करण्याची प्रेरणा मिळत होती. अशा महान खेळाडूकडून मिळालेले मार्गदर्शन माझ्या कारकिर्दीत खूप महत्त्वाचे ठरले”.
दरम्यान, 1962 सालच्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघाचे ते प्रमुख खेळाडू होते. 1960 साली झालेल्या रोम येथील स्पर्धेत त्यांनी फ्रान्सविरुद्धच्या लढतीत केलेल्या अफलातून गोलमुळे भारताने हा सामना 1-1 असा बरोबरीत सोडविला होता. 1956 सालच्या मेलबर्नमधील समर ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांच्याच कामगिरीच्या जोरावर भारताने यजमान ऑस्ट्रेलियाचा 4-2 असा पराभव केला होता. सातत्याने दुखापती झाल्यामुळे त्यांनी 1967 साली फुटबॉलमधून निवृत्ती घेतली.