ओव्हल – खेळपट्टी पाहिल्यावर पहिल्यांदा गोलंदाजी करत असलेल्या संघाला लाभ होइल असा माझा ग्रह होता. मात्र, पहिल्या काही षटकांनंतर आमचे नियोजनच चुकले. आम्ही प्रयत्न केले, लढचही दिली मात्र, ज्या पद्धतीने ऑस्ट्रेलियाने कामगिरी केली त्यावरून असेच सांगावेसे वाटते की जगज्जेतेपदावर त्यांचाच हक्क होता, असे मत पराभवानंतर बोलताना भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केले आहे.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा जिंकत आयसीसीच्या क्रिकेटच्या सर्व तीनही प्रकारातील विश्वविजेता बनणारा पहिलाच संघ ऑस्ट्रेलिया ठरला आहे, त्यासाठी त्यांचे अभिनंदनही रोहितने केले. ऑस्ट्रेलियाने त्यांचे पहिल्या डावात तीन प्रमुख फलंदाज गमावल्यावरही ज्या जबाबदारीने फलंदाजी केली ती शब्दात व्यक्त करता येणार नाही. आम्ही त्यांच्यावर दडपण राखण्यात कमी पडलो.
खासकरून ट्रेव्हीस हेड व स्टीव्ह स्मिथ यांनी जिद्दी शतके साकार केली तेव्हाच सामन्यावर त्यांचे नियंत्रण बसू लागले. आम्हीही पहिल्या डावात चांगली फलंदाजी केली. मात्र, एका फलंदाजाकडून मोठी खेळी होणे गरजेचे होते व तिथे आम्ही कमी पडलो, असेही रोहितने सांगितले.
वातावरण व खेळपट्टी पाहून नाणेफेक जिंकल्यावर आन्ही काही नियोजन केले होते ते साफ अपयशी ठरले. त्यांनी आमच्या प्रत्येक योजनांवर मात केली. त्यांच्या गोलंदाजांनी त्यांच्या आराखड्यानुसार प्रत्येक फलंदाजाची शैली ओळखून गोलंदाजी केली त्याचे कौतुक वाटते.
हेड व स्मिथ यांनी त्यांना धावांचा भक्कम पाठिंबा दिला होता, त्यामुळे ते कोणताही ताण न घेता गोलंदाजी करत होते व आमचे फलंदाज अत्यंत स्वस्तात बाद होत गेले, असेही रोहितने सांगितले.सामना जेव्हा अशा स्थितीत असतो तेव्हा त्या सामन्यात परतणे कठीण बनते. आम्ही त्यांना दुसऱ्या डावात समाधानकारक लढत दिली.
मात्र, त्यांना पहिल्या डावात मिळालेले दीडशतकी अधिक्यच निर्णायक ठरले. दुसरा डाव सुरू झाल्यावरही खेळपट्टीचांगली होती, त्यावर उभे राहण्याची जिद्द ठेवली असती तर कदाचित निकाल वेगळा दिसला असता मात्र, क्रिकेटमध्ये जर-तर या शब्दाला अर्थ नसतो. ते चांगले खेळले व विजेतेपदावर त्यांचाच हक्क होता असे म्हणेन.
या पराभवामुळे आम्ही निराश झालो असलो तरीही पुढील काळात हे अपयश विसरून यशस्वी वाटचाल करू. येथील क्रिकेटप्रेमींनीही भरपूर पाठिंबा दिला त्यासाठी त्यांचेही आभार मानतो, असेही रोहित म्हणाला. तसेच येत्या काळात मिळणार असलेल्या विश्रांतीमुळे वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी संघातील सर्व खेळाडू ताजेतवाने राहमार आहेत. ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे व तेथे सरावासाठीही जास्त वेळ मिळेल, असेही रोहित म्हणाला.