नवी दिल्ली – “बिपरजॉय’ वादळामुळे उद्भवू शकणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र तसेच गुजरात राज्य सरकारची मंत्रालये तसेच सरकारी संस्थांच्या सज्जतेचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली.
असुरक्षित ठिकाणच्या रहिवाशांना राज्य सरकारतर्फे सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात यावे, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे निर्देश पंतप्रधानांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.
तसेच त्या भागातील वीजपुरवठा, दूरसंचार सेवा,आरोग्य सुविधा, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा यांसारख्या सर्व अत्यावश्यक सेवा सुरू राहतील आणि वादळामुळे त्यांचे नुकसान झाल्यास त्या त्वरित पूर्ववत करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
गृह मंत्रालय चक्रीवादळाशी संबंधित सद्यःस्थितीचा सातत्त्याने आढावा घेत असून, राज्य सरकार आणि संबंधित केंद्रीय यंत्रणांच्या संपर्कात आहेत. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने आपल्या 12 तुकड्या तैनात केल्या असून, त्या बोटी, झाडे कापणारी यंत्र, दूरसंचार उपकरणे इत्यादींनी सुसज्ज आहेत तसेच 15 राखीव तुकड्या देखील सज्ज ठेवल्या आहेत.
भारतीय तटरक्षक दल आणि नौदलाने मदत, शोध आणि बचाव कार्यासाठी जहाजे आणि हेलिकॉप्टर तैनात केली आहेत. नौका आणि बचाव उपकरणांसह भारतीय हवाई दल आणि लष्कराच्या अभियंता कृती दलाच्या तुकड्याही तैनातीसाठी सज्ज आहेत.
पाळत ठेवणारी विमाने आणि हेलिकॉप्टर किनारपट्टी भागावर लक्ष ठेवत आहेत. लष्कर, नौदल आणि तटरक्षक दलाची आपत्ती निवारण पथके आणि वैद्यकीय पथकेही सज्ज आहेत.