पवना धरण परिसरात बारा तासात झाला “इतका पाऊस”
पवना नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
पिंपरी : मावळासह पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा होणाऱ्या पवना धरण 100 टक्के भरले आहे. तर गुरूवारी रात्रीपासून मावळसह धरण परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणातून आज सकाळी सहा वाजल्यापासून टप्प्या-टप्प्याने पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे.
काही वेळापूर्वी 5600 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. गेल्या बारा तासांत 78 मिली मीटर पाऊस पडला आहे. तसेच मावळातील वडिवळे आणि आंद्रा धरणही शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे या धरणांतून इंद्रायणी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पवना धरण 100 टक्के भरलेले आहे. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाचे जोरदार पुनरागमन झाले आहे. तसेच धरण पाणलोट क्षेत्रात पाऊसचा जोर वाढला आहे. ही बाब लक्षात घेता वीज निर्मिती गृहाव्दारे पवना नदीमध्ये शुक्रवारी सकाळी 6 वाजता 1400 क्यूसेक विसर्ग, त्यानंतर आठ वाजता धरणाच्या सांडव्यावरून 2100 क्यूसेक असे एकूण 3500 क्यूसेक विसर्ग करण्यात आला.
दुपारी दोन वाजता 3500 क्युसेकवरून 5600 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तसेच पावसाचा जोर कमी जास्त पाहून यामध्ये बदल करण्यात येणार असल्याचे पवना धरणाचे शाखा अभियंता समीर मोरे यांनी सांगितले.
पवना नदी काठच्या नागरिकांनी नदीपात्रात कोणीही उतरू नये, नदी मधील पाण्याचे पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत, असेही आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, मावळातील वडिवळे धरणही शंभर टक्के भरले आहे.