पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेची वाटचाल स्मार्ट सिटीकडे सुरू आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत नागरिकांना मिळत असलेल्या सोयीसुविधांमुळे नागरिकांची शहराला पसंती मिळत आहे. परंतु पिंपरी येथील रेल्वे स्थानकाला समस्यांचा विळखा पडला आहे. याकडे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने रेल्वे प्रवाशांची गैरसोय होत आहे.
उद्योगनगरीतील पिंपरी रेल्वे स्थानक महत्त्वाचे आहे. या स्थानकावरून दररोज हजारो प्रवासी पुणे, लोणावळा व इतर ठिकाणी प्रवास करतात. पिंपरी रेल्वे स्थानकावर लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना थांबा नसला तरी पुणे-लोणावळा लोकल व सिंहगड एक्स्प्रेस गाडीला थांबा असल्याने मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची वर्दळ असते. पिंपरीवरून पुणे आणि लोणावळ्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यात व्यावसायिक, विद्यार्थी, नोकदार, पर्यटक आदींचा समावेश आहे. रेल्वेचा प्रवास सर्वसामान्य नागरिकांना परवडणारा असल्याने लोकलला मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. परंतु काही वर्षांपूर्वीच पिंपरी येथील रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. सुसज्ज असे रेल्वे स्थानक बनविण्यात आले आहे. परंतु रेल्वे प्रशासनाचे लक्ष नसल्याने आजूबाजूच्या झोपडपट्टीतील लहान मुले, फिरस्ते, आदींचा वावर रेल्वे स्थानकावर वाढला आहे. ते रेल्वे स्थानकात घाण करत आहेत. त्यामुळे येथे येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे.
रेल्वे स्थानकावरील आसन व्यवस्थेवर फिरस्ते व्यक्ती, टवाळखोर बसलेले असतात. त्यामुळे लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसण्यासाठी जागा मिळत नाही. बऱ्याच वेळा टवाळखोर गुटखा खाऊन पटरीवर, स्थानक परिसरात थुंकत आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानकाचे विद्रुपीकरण होत आहे. तसेच रेल्वे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. अनधिकृत विक्रेत्यांचा हस्तक्षेप वाढला आहे.
मोकाट कुत्र्यांचा वाढला वावर
पिंपरी रेल्वे स्टेशनवर व परिसरात मोठ्या प्रमाणावर मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना स्टेशनवर असुरक्षित वाटत आहे. काही वेळेस कुत्रे प्रवाशांच्या अंगावर धावून येत आहेत. रात्रीच्या वेळी महिला प्रवासी व नागरिकांना असुरक्षित वाटत आहे. त्यामुळे येथील रेल्वे स्टेशनच्या सुरक्षेच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाने उपाययोजना करणे गरजेचे आहे.
बेशिस्त पार्किंग
शहरातील बरेच नागरिक आपल्या पाहुण्यांना अथवा घरांतील व्यक्तींना रेल्वे स्थानकावर स्वतःच्या गाड्यांनी सोडविण्यासाठी येतात. परंतु नागरिक वाहने पार्किंगच्या ठिकाणी न लावता पिंपरी गाव व पुणे-मुंबई महामार्गाकडे जाणाऱ्या गेटसमोरच दुचाकी, चारचाकी तसेच रिक्षा पार्क करत आहेत. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना येथून मार्ग काढताना कसरत करावी लागत आहे. येथे वाहने बेशिस्तपणे पार्क केली जातात परंतु रेल्वे प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने याला खतपाणी मिळत आहे.