पिंपरी – उद्योगनगरीतील हजारो उद्योगांमध्ये दिवाळीच्या बोनसचे वाटप झाले असून आनंदाचे वातावरण आहे. तर काही कंपन्यांमध्ये कंपनी व्यवस्थापनाच्या विरोधात गेल्या काही दिवसांपासून आंदोलने सुरू आहेत. दिवाळीपूर्वी उद्योगनगरीत असे परस्परविरोधी चित्र अनेक ठिकाणी दिसून येत आहे.
दिवाळीनिमित्त कामगारांना बोनस मिळाला असून, शहरातील विविध ठिकाणच्या बाजारपेठा ग्राहकांच्या गर्दीने गजबजू लागल्या आहेत. मात्र, शहराबरोबर अन्य औद्योगिक वसाहतींमधील अनेक कंपन्यांमधील कामगारांचे विविध मागण्यांकरिता संप, आंदोलन सुरु आहेत. ऐन दिवाळीत हे कामगार कंपनी व्यवस्थापनाविरोधात शिमगा करत असल्याचे चित्र आहे. एकीकडे सजलेल्या बाजारपेठांमध्ये खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे; तर दुसरीकडे मागण्यांसाठी आंदोलन करणारे कामगार असे चित्र दिसत आहे.
पिंपरी-चिंचवड औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांकडून मिळणाऱ्या जकात कर व विविध करांमधून मिळालेल्या घसघशीत महसूलाच्या जोरावर पिंपरी-चिंचवड महापालिकेने अशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिकेचा मान मिळविला होता. यावरून एमआयडीसीतील कंपन्यांमधील आर्थिक उलाढालीचा अंदाज लावता येऊ शकतो. मध्यंतरीच्या काळात जागतिक आर्थिक मंदी, करोना व अन्य कारणांचा कंपन्यांना फटका बसला. मात्र, बहुराष्ट्रीय कंपन्यांना तुलनेत याची कमी झळ बसली. या काही बाबींचा अपवाद सोडला तर आता कामगार व व्यवस्थापनातील औद्यागिक संबंध ताणले गेल्याने अनेक कंपन्यांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. त्यासाठी नवीन कामगार संघटना तयार करणे व अनेक मागण्या व अन्य बाबींचा समावेश आहे.
पिंपरी-चिंचवड औद्योगिक वसाहतीमधील तीन मोठ्या आणि काही मध्यम उद्योगांमध्ये कामगार – व्यवस्थापना दरम्यान संघर्ष सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. तसेच तळेगाव एमआयडीसीतील जनरल मोटर्स कंपनीतील कामगारांची राज्य सरकारशी झालेली चर्चा फिसकटल्याने त्यांचे साखळी उपोषण सुरू आहे.
ताणले जात आहेत संबंध
वास्तविक पाहता, औद्योगिक शांतता प्रस्थापित करून, कामगार व उद्योगाचे हित साधण्यासाठी कामगार, कामगार संघटना व कंपनी व्यवस्थापन यांच्यामधील संबंध सौहार्दपूर्ण असणे आवश्यक असते. यामध्ये बेबनाव निर्माण झाल्यास औद्योगिक संबंध ताणले जात आहेत. ताणले गेलेले संबंध पुन: प्रस्थापित करण्यासाठी कामगार आयुक्त कार्यालयाचे प्रतिनिधी अथवा खासगी लवाद महत्वाची भूमिका बजावू शकतात. मात्र, कंपनी व्यवस्थापनाकडून कामगार आयुक्त कार्यालयाचे आदेश, सूचना धुडकावून लावल्या जात असल्याने औद्योगिक संबंध आणखी ताणले जात आहेत. तर काही ठिकाणी कामगार संघटनांच्या मागण्या मान्य करणे व्यवस्थापनासाठी अशक्य असते. यामुळे कामगार आपला रोष हा संप, आंदोलनांच्या माध्यमातून व्यक्त करत आहेत.
कामगार- कंपनी व्यवस्थापन यांच्यातील सौहार्दपूर्ण संबंध असणे दोन्ही घटकांच्या विकासासाठी महत्वपूर्ण मानले जाते. मात्र, या दोन्ही घटकांनी आपली जबाबदारी ओळखून ती चोखपणे पार पाडल्यास शक्यतो औद्योगिक संबंध ताणले जात नाहीत. एखादा विषय संबंध बिघडेपर्यंत ताणला जाऊ नये, याची दोनही घटकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे.
-अनिल रोहम, कौन्सिल मेंबर, आयटक