- गर्भवती महिला, तृतीयपंथी व एका तरुणाने संपविले जीवन
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात गेल्या दोन दिवसांत तीन जणांनी आत्महत्या केली आहे. यामध्ये एक गरोदर महिला, तृतीयपंथी आणि एका तरुणाचा समावेश आहे. या घटना चिखली आणि ताथवडे परिसरात घडल्या.
पती बाहेर जेवायला गेल्याने गळफास
ताथवडे येथे रविवारी (दि. 7) रात्री मायादेवी लक्ष्मण अंककले (वय 25, रा. सुभाष पवार यांची चाळ, ताथवडे) या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी रात्री मायादेवी यांनी जेवणाकरिता फक्त भात बनविला होता. मला जेवायला भाकरी हवी, मी बाहेर जेवायला जातो, असे सांगून पती घराबाहेर गेले. या कारणामुळे मायादेवी यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी सासरकडील नातेवाइकांच्या ताब्यात मृतदेह दिला नाही. मयत मायादेवी हिचे नातेवाईक कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथील आहेत. मंगळवारी दुपारी ते नातेवाइुक पिंपरीत दाखल झाले आहेत.
तरुणाची अज्ञात कारणास्तव आत्महत्या
अरुण राजेंद्र पाटील (वय 33, रा. पाटीलनगर, चिखली) या तरुणाचे सोमवारी (दि. 8) सायंकाळी सव्वासहा वाजताच्या सुमारास राहत्या घरी सिलिंगच्या हुकाला नायलॉन दोरीने गळफास घेतला. ही बाब लक्षात येताच त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना त्वरीत वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
आर्थिक अडचणीमुळे तृतीयपंथियाने संपविले जीवन
राहुल ऊर्फ अंकिता ऊर्फ रोशनी जगदीश भानत (वय 23, रा. रुपीनगर, तळवडे) असे आत्महत्या केलेल्या तृतीयपंथियाचे नाव आहे. भानत मूळचे मुंबईचा रहिवासी असून दोन महिन्यांपूर्वी ते पिंपरी चिंचवड शहरात दाखल झाले होते. रूपीनगर, तळवडे येथे खोली भाड्याने घेऊन राहत होते. भिक्षा मागून गुजराण करीत होते. आर्थिक चणचणीमुळे त्यांनी मध्यरात्री बारा वाजताच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली.