पिंपरी – मागील तीन ते चार वर्षांपासून मोहननगर येथील जलतरण तलाव बंद आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून महापालिकेचेही आर्थिक नुकसान होत आहे. हा तलाव तातडीने सुरू करावा. अशी मागणी माजी नगरसेविका मिनल यादव यांनी केली आहे.
याबाबत यादव यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मोहननगर येथील तलाव करोना संक्रमनामुळे बंद करण्यात आला होता. त्याला ३ ते ४ वर्षे होऊन गेली. करोनानंतरच्या काळात या जलतरण तलावाची उंची कमी करण्याच्या कारणास्तव गेल्या अनेक वर्षांपासून हा तलाव बंद आहे.
यासंदर्भात वेळोवेळी पाठपुरावा करूनही तलाव सुरू करण्यात येत नाही. क्रीडा विभाग, क्रीडा स्थापत्य विभाग कारणे सांगून एकमेकांवर चालढकल करत आहेत. हा तलाव लवकरात लवकर सुरू करण्यात यावा. अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल. असा इशारा यादव यांनी दिला आहे.