पिंपरी – रक्षाबंधन, बहिणा-भावाच्या अतूट प्रेमाचे नाते असलेला सण. डिजिटल शुभेच्छांच्या युगात प्रत्यक्ष मिळालेली राखी म्हणून तिचे महत्त्व जास्त.या सणानिमित्त अनेक बहिण-भावांना एकमेकांकडे काही कारणांनी जाता येत नाही, अशा वेळी बहिणी आपल्या भावाला पोस्टाने राख्या पाठवितात. त्यासाठी आधीच राख्यांची खरेदी होते. तसेच त्या वेळेत पोहचाव्यात, यासाठी त्या रक्षाबंधनापूर्वीच पाठविल्या जातात. त्यासाठी पोस्टाने खास रक्षाबंधनासाठी विशेष पाकीट आणले असून शहरातील 33 टपाल कार्यालयांमध्ये खास सुविधाही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
येत्या 30 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा सण साजरा होणार आहे. त्यानिमित्त भावाला राखी पाठविण्यासाठी पोस्ट विभागाने तयार केलेल्या विशेष “राखी पाकीट’मधून राख्या पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पोस्टचे हे राखी पाकीट वैशिष्ट्यपूर्ण आहे. या पाकिटावर 5 रुपयांचा छापील स्टॅम्प असून एका पाकिटाची किंमत 10 रुपये आहे. तसेच या पाकिटासाठी दर्जेदार कागद उपयोगात आणला गेला आहे. पावसात हे भिजणार नाही, की चुरगळणार नाही. तसेच त्यावर राखीचे चित्र असल्याने ते राखीचे पाकिट असल्याने विलगीकरणास सोपे जाणार आहे. त्यामुळे उशिरा पोहचली, अशी सबब आता राहणार नाही.
शहरात सध्या विविध प्रकारच्या राख्या बाजारात विक्रीसाठी आल्या असून महिलांची खरेदीसाठी गर्दी होत आहे. या राखीबरोबरच पाकिटेही घेतली जातात. मात्र, पोस्टाने ते उपलब्ध करून दिल्याने महिलांची आता त्यासाठी धावाधाव थांबली आहे. तसेच या पाकिटाची किंमतही केवळ दहा रुपये आहे. त्यामुळे राखी पाठविण्यासाठी महिलांनी फक्त मनपसंत राखी घेऊन ती पोस्टात जायचे आहे.
ग्राहक राख्या स्पीड पोस्टनेही पाठवू शकतात. ज्यामुळे अगदी परदेशातही राख्या अतिशय जलद आणि वेळेवर पोहोचू शकतील. यावर लिहिलेल्या “राखी’ या शब्दामुळे त्याचे विलगीकरण करणे सोपे जाते. वेळेत राख्या पोहोचवण्यासाठी मोठ्या टपाल कार्यालयात पिनकोड नमूद केलेल्या पेट्या ठेवण्यात आल्या आहेत. राखी पाकीट वेळेत पोहोचवण्यासाठी सर्व पोस्ट ऑफिसमध्ये सूचना दिल्या आहेत.
– के. एस. पारखी, जनसंपर्क अधिकारी, चिंचवड.