यशोगाथा माणदेशी महिलांची
श्रीकांत कात्रे
माणदेशी फाउंडेशन आणि माणदेशी महिला सहकारी बॅंक या दोन्ही संस्थांनी ग्रामीण भागातील महिलांना व्यवसायातून आर्थिक प्रगती साधण्यासाठी सातत्याने चालना दिली. म्हणूनच भेळपुरी, चाट सेंटर यांसारख्या वेगळ्या व्यवसायातून सविता बोबडे यांनी आपल्या कुटुंबाच्या आर्थिक प्रगतीला मोठा हातभार लावला.
सविताताई खटाव या गावच्या रहिवासी. सुरुवातीला त्या भेळपुरी, रगडापुरी, शेवपुरी, दही शेवपुरी, मसालापुरी, भेळ, पॅटिस, चुरापुरी, सामोसे, दाबेली, शेवबुंदी, चिवडा, भडंग, मक्याचा चिवडा असे पदार्थ घरातून करत होत्या. परंतु, त्यामुळे त्यांना म्हणावे असे उत्पन्न मिळत नव्हते व घरखर्चही भागत नव्हता. व्यवसाय वाढवायचा होता. पण भांडवल कमी पडत होते. अशा वेळी माणदेशी फाउंडेशनशी जोडले गेले आणि फायनान्सियल लिटरसी घेतली. त्यामुळे मला माझ्या खर्चाचे नियोजन व बचतीचे महत्व समजले, असे सविताताईंनी सांगितले.
मला माणदेशी महिला बॅंकेशी जोडून दहा हजाराचे कर्ज मिळाले व त्यामधून मी भेळ पाणीपुरीचा गाडा तयार केला. मी गावोगावीच्या यात्रांमध्ये स्टॉंल लावला. गावात तसेच शाळेच्या बाहेर वेळेचे नियोजन करून स्टॉंल लावल्यामुळे मुलांचे शिक्षण व घरखर्च व्यवस्थित भागवू शकले, असे त्या सांगत होत्या. खटाव गावापासून थोडे दूर असलेल्या शहाजीराजे महाविद्यालय आणि श्री लक्ष्मीनारायण इंग्लिश स्कूलचा परिसर तसेच चावडी चौकात दिसणारा रेणुका भेळपुरी आणि चाट सेंटरचा गाडा परिसरातील खवैय्यांचे आवडते ठिकाण बनले आहे ते सविता रवींद्र बोबडे यांनी तयार केलेल्या रुचकर पदार्थांमुळे. हा चाट सेंटरचा गाडा म्हणजे शून्यातून निर्माण केलेले आमचे वेगळे विेशच आहे आणि केवळ माणदेशीने केलेल्या मदतीमुळे हा व्यवसाय उभा राहिला, असे सविता बोबडे सांगत होत्या. बोबडे कुटुंबीयांचा पूर्वी एक छोटा स्टॉल होता. त्यातून चॉकलेट, गोळ्या, बिस्किटे अशा बालगोपाळांसाठी लागणाऱ्या वस्तू विकल्या जायच्या.
पण माणदेशीचा संपर्क झाला आणि गोळ्या बिस्किटांची जागा भेळ व पुऱ्यांनी घेतली. कल्पनाही केली नव्हती असे व्यवसायाचे स्वरूपच बदलून गेले. सुरवातीला माणदेशीने दिलेल्या कर्जातून साधा गाडा बनवून व्यवसायाला सुरवात केली. माणदेशीने वेळोवेळी केलेल्या सहकार्यामुळे व प्रोत्साहनामुळे व्यवसाय वाढत गेला. पाच वर्षांपूर्वी माणदेशीने दिलेल्या 40 हजारांच्या कर्जामुळे सध्याचा चाट सेंटरचा आकर्षक गाडा दिसू लागला. त्यानंतर ग्राहकांचा प्रतिसादही मोठ्या प्रमाणावर वाढू लागला. वर्षभरातच सारे कर्ज फिटले. आता व्यवसाय स्थिर झाल्याचे चित्र असले तरी सुरवातीच्या काळात सविताताईंना मोठा संघर्ष करावा लागला. अडचणी तर खूप आल्या. पण त्यातूनच शिकत गेले, असे त्यांनी सांगितले. बारीक शेव वगळता पाणीपुरीच्या पुरीपासून सारेच पदार्थ त्या घरी तयार करतात. पुऱ्या तसेच इतर पदार्थ करताना सुरवातीला बिघडलेही. त्यात दुरूस्ती करत त्या पुढे जात राहिल्या. या सर्व पदार्थांची खासियत काय, असे विचारलेतर सर्वच पदार्थ खास असल्याचे ग्राहक सांगतात, असे उत्तर त्या देतात.
दरम्यानच्या काळात माणदेशीच्यावतीने डीजिटल प्रशिक्षण मिळाले. त्यातून हिशोब कसा ठेवायचा, अकाउंटस, फोन पे, गुगल पेचा वापर, ऑनलाइन व्यवहार हे सारे शिकता आले. लॉकडाऊनच्या काळात सारे ठप्प होते, त्यावेळी पार्सल सेवा सुरू करण्याचे माणदेशीने सुचविले. मग भेळ, सामोसे असे पदार्थ घरपोच देण्यासाठी पार्सल सुविधा सुरू केली. त्या काळात ही पार्सलची कल्पना किफायतशीर ठरली. खटाव गावामध्ये हा गाडा लोकप्रिय झालाच. परंतु, आजूबाजूच्या लोणी, भोसरे, पुसेगाव, कटापूर तसेच सातारा तालुक्यातील गावे अशा गावातील छोट्यामोठ्या यात्रांमध्येही चाट सेंटरच्या व्यवसायाने त्यांना मोठा हातभार दिला.
व्यवसाय यशस्वी होत गेला तसा कामाचा व्यापही वाढला. त्यासाठी कष्ट आणि मेहनतीला पर्याय नाही, हे ओळखून त्यांनी जिद्दीने व्यवसायाचा डोलारा सांभाळला. दर रविवारी सकाळी नऊ ते सायंकाळी सातपर्यंत त्या आठवडाभराचा माल तयार करून घेतात. सोमवारी त्या पुऱ्या तयार करून ठेवतात. त्यांचा चाट सेंटरचा हा गाडा सकाळ ते दुपारपर्यंत शाळा महाविद्यालयाच्या परिसरात असतो. तर सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत गावातील चावडी चौकात असतो. पूर्वी त्या एकट्याच गाड्यावर असायच्या. आता पतीही त्यांना मदत करतात. घरातील सर्व सदस्यांचे त्यांना सहकार्य असते. परिसरातील हा चाट सेंटरचा एकमेव गाडा असल्याने रूचकर, स्वादिष्ट पदार्थांना मागणी वाढती आहे. भेळपुरीचा गाडा सांभाळणे तसे दैनंदिन कष्टाचे काम. माणदेशीच्या प्रोत्साहनामुळे या गाड्यानेच आमच्या कुटुंबाला आर्थिक प्रगतीची दिशाही दाखवली, असे त्यांनी नमूद केले.