भोसरी – पिंपरी चिंचवड महापालिकेने मागील काही महिन्यांपूर्वी पुणे नाशिक या राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमण हटवून रस्ता रुंदीकरणाचे संकेत दिले. परंतु अतिक्रमण काढून कित्येक महिने उलटून अद्याप रुंदीकरण होत असल्याने नागरिकांसह वाहनचालकांची गैरसोय होत आहे. तरी नाशिक फाटा ते मोशी रस्त्याचे रुंदीकरण करून येथील वाहतूक कोंडी सोडवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या नाशिक फाटा ते मोशी या 12 कि.मी. सेवा रस्त्याचे काम मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या मार्गालगत असणाऱ्या भोसरीतील सद्गुरुनगर, इंद्रायणीनगर, लांडगेनगर, गुरुविहार-पांजरपोळ, जयगणेश साम्राज्य, वखार महामंडळ भागातील नागरिक व वाहनचालक यांना सेवामार्ग नसल्याने महामार्ग ओलांडताना व उलट दिशेला प्रवास करताना महामार्गावरून येणाऱ्या वेगवान वाहनांमुळे रस्ता अपघाताला सामोरे जावे लागत आहे.
याबाबत अनेक वर्षांपासून डी.पी.आर.चे काम पूर्ण नसल्याचे समजते यास मंजुरी देणेकामी व काम सुरू करणे कामी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्याशी समन्वय साधून या ठिकाणी रस्ता विस्तारीकरण, ग्रेडसेपरेटर, पादचारी पूल, भुयारी मार्ग करण्याचे काम सुरू करण्यात यावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
पुणे-नाशिक राज्य मार्गावर दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. तसेच भोसरी, बनकर वस्ती, मोशी आदी परिसरात टोलेजंग इमारती होत असल्याने नागरिकांची संख्या वाढल्याने रस्त्यावरील वाहनांची संख्येत देखील वाढ झाली आहे. परिणामी प्रस्तावित असा सहा पदरी रस्ता कधी होणार असा प्रश्न वाहनचालक व स्थानिक नागरिक करत आहेत.
पुणे-नाशिक मार्गावर दोन पदरी रस्त्यावरून दोन्ही बाजूने वाहतूक होत आहे. जिवावर उदार होऊन विरुद्ध दिशेने प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नियमांचे पालन होत नसल्याने लहान मोठे अपघात सातत्याने होत आहेत. महामार्गाला लागून असलेल्या नागरी वसाहती लांडगेनगर, गुरु विहार कॉलनी, क्षेत्रीय कार्यालय आहेत. लांडगेनगरमध्ये कच्चा माल बनविणारे छोटे उद्योग आहेत. त्यामुळे मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची सारखी वर्दळ असते. ई क्षेत्रीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, आलेल्या वाहनांना किंवा येथील स्थानिक रहिवाशांना भोसरीकडे जायचे असल्यास त्यांना गोडाऊन चौकात जाऊन वळण घ्यावे लागते.
एक किलोमीटर पुढे जाऊन वळण घेण्यापेक्षा आलेल्या मार्गानेच वाहनचालक माघारी फिरून इंद्रायणी कॉर्नरला येऊन वळण घेत आहेत. त्यामुळे एकाच रस्त्यावर दोन्ही बाजूने भरधाव वेगाने वाहने धावत असतात. वाहनचालक नियमबाह्य वाहतूक करीत असून, दोन्ही बाजूने होणारी वाहतूक कोणाच्या तरी जीवावर बेतू शकते. अशा बेशिस्त वाहनधारकांना वेळीच आवर घालण्यासाठी कारवाईची मागणी होत आहे. परंतु त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
नियमांची होतेय पायमल्ली
शहरामध्ये विनापरवाना वाहनचालवणाऱ्यांचीही संख्या मोठी आहे. परंतु त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने नियम मोडणाऱ्यांची संख्या वाढत आहे. तसेच हेल्मेट सक्तीकडेही दुर्लक्ष केले जात आहे. त्याचीही अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. परंतु प्रशासकीय यंत्रणा दुर्लक्ष करत असल्याने अपघातांची संख्या वाढत चालली आहे. नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कारवाई करण्याची आवश्यकता आहे.
महामार्गावर अनधिकृत पार्किंग
महापालिकेच्या वतीने नाशिक फाटा ते मोशी परिसरातील रस्ता रुंदीकरणात येणारे अतिक्रमण हटविण्यात आले. रस्ता मोकळा करण्यात आला. परंतु पुणे-नाशिक रस्त्याचे रुंदीकरण न झाल्याने या मोकळ्या जागेत वाहनचालक आपली वाहने पार्क करत आहेत. त्यामुळे या परिसरात रस्त्याला अनधिकृत वाहनतळाचे स्वरूप येऊ लागले आहे.