पिंपरी – वाहतूक नियमन करणारे पोलीस, चौकीत काम करणारे पोलीस, भांडण सोडविण्यासाठी गेलेले पोलीस, गुंडांवर कारवाई करण्यासाठी गेलेले पोलीस; अशा विविध प्रसंगात थेट पोलिसांवर हल्ले करण्यापर्यंत काही जणांची मजल गेली आहे. अशा एक-दोन नव्हे तर वर्षभरात 48 घटना घडल्या आहेत. त्या तुलनेत इतर शासकीय कर्मचाऱ्यांची संख्या पाहता ती अत्यल्प असून इतर सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ल्याच्या 15 घटना घडल्या आहेत. यामुळे सर्वाधिक रोष पोलिसांवर निघत असल्याचे दिसून येत आहे. इतर शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांपेक्षा तीन पटींनी अधिक पोलिसांवर हल्ले झाले आहेत.
पोलीस हा घटक समाजाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र राबत आहे. समाजात कुणालाही असुरक्षित वाटत असेल तर नागरिक थेट पोलिसांची मदत घेऊ शकतात. पण नागरिकांना सुरक्षा देणारे, त्यांच्या अडचणीत मदत करणारे पोलिसच असुरक्षित झाल्याचे चित्र पिंपरी-चिंचवड शहरात निर्माण झाले आहे. पोलीस समाजाला सुरक्षा प्रदान करण्यासाठी अहोरात्र कर्तव्य बजावतात. वाहतुकीचे नियमन, मंत्र्यांच्या सुरक्षा, दौरे, शहरातील गल्ली बोळांमध्ये आणि खेड्यापाड्यातील वस्त्यांवर गस्त, किरकोळ चोरट्यांपासून मोठमोठ्या गुन्ह्यांच्या तपासात पोलीस कार्यरत असतात. पण समाजाची सुरक्षा करणारे पोलिसच सुरक्षित राहिलेले नाहीत. आश्चर्याची बाब म्हणजे ही परिस्थिती काल-परवापासूनची नसून गेल्या काही वर्षांपासून सातत्याने सुरू आहे. गेल्या पाच वर्षांचे आकडे पाहिले असता सगळ्यात जास्त हल्ले हे पोलिसांवरच झाले आहेत.
वाहतूक नियमन करताना पोलिसांसोबत हुज्जत घालून त्यांच्या कामात अडथळा निर्माण केला जातो. काही वेळेला वाहतूक पोलिसांवर हातही उचलला जातो. चौकीत काम करणाऱ्या पोलिसांना दमदाटी करून त्यांच्यावर दबाव आणून त्यांना त्रास दिला जातो. पोलिसांना त्यांची नोकरी घालविण्याची धमकी देत पोलीस म्हणजे पालापाचोळा असल्याची शाब्दिक वागणूक त्यांना दिली गेल्याचे अनेक प्रकार शहरात घडले आहेत. तडीपारी सारखी प्रतिबंधात्मक कारवाई केलेले गुंड परवानगी शिवाय शहरात येतात. त्यांची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या गुंडांवर कारवाई करण्यासाठी जातात. अशा वेळेला हे गुंड थेट पोलिसांवर शस्त्रे घेऊन धावून येतात. पोलिसांना जीवे मारण्याची धमकी देतात.
अशा टोळक्यांना चाप बसलाच पाहिजे
कोयत्याने वार करत तरुणाला टोळक्याने जखमी केले. जीव वाचविण्यासाठी हा तरुण काळेवाडी पोलीस चौकीत गेला. त्यानंतर दहा जणांच्या टोळक्याने थेट पोलीस चौकीवर दगड फेकून मारले. कोयता उगारून परिसरातील नागरिकांना धमकावले. अशा प्रकारची गुरगुर काही टवाळखोरांमध्ये वाढत आहे. त्यांच्यावर वेळीच कारवाई करणे आणि अशा टोळक्यांवर चाप बसविलाच पाहिजे. अन्यथा ही दहशत सर्वसामान्यांचे जगणे अवघड
करू शकते.