जाधववाडी – संत सावता महाराज मंदिराजवळ रस्त्यात मोठा चढ असल्याने लोडच्या गाड्या अथवा इलक्ट्रिक गाड्यांना अपघात घडत आहे. यापूर्वी देखील अनेक वाहनांना अपघात घडला आहे. परंतु पिंपरी चिंचवड महापालिकेचा संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांना व वाहनचालकांना येथून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे येथील चढ कमी करून रस्ता वाहतुकीस सुरळित करावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने समाविष्ट गावांचा विकास मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. समाविष्ट गावांमध्ये रस्ते, पाणी, वीज, शिक्षण आदी मूलभूत सुविधा पुरविण्यात येत आहेत. जाधववाडीमध्ये देखील जाधव सरकार चौक ते चिखलीकडे जाणाऱ्या मार्गाचे काम मागील काही वर्षांपासून सुरू आहे. परंतु हा मार्ग विस्तृत आणि चांगला झाला असला तरी अजूनही पूर्णत्वास गेलेला नाही. अर्धवट कामांमुळे या मार्गावर सातत्याने अपघात घडत आहेत. परंतु याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी व महापालिका प्रशासनच दुर्लक्ष करत असल्याने अनेक वर्षांपासून रस्त्यातील हा चढ धोकादायक ठरत असून देखील तो कमी करून वाहतूक सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत नाहीत.
मागील दोन दिवसांपूर्वी संत सावतामाळी मंदिराजवळ असलेल्या धोकादायक चढावर प्लायवुड वाहून नेणाऱ्या टेम्पोतून प्लयवूड थेट रस्त्यावर पडले. चढ चढताना टेम्पोचा पुढील भाग वर उचलल्याने ही घटना घडली. परंतु टेम्पोच्या पाठीमागे चार चाकी गाडी येत होती. त्या वाहनचालकाने प्रसंगावधान राखल्याने अपघात घडला नाही.
शालेय विद्यार्थ्यांना अपघाताचा धोका
जाधववाडीतील हा महत्त्वाचा रहदारीचा मार्ग आहे. या मार्गावर महापालिकेची एक शाळा आणि खासगी दोन शाळा आहेत. या सर्व शाळांमधील विद्यार्थी व नागरिक या मार्गावरून ये-जा करतात. ही घटना शाळा सुरू अथवा सुटण्याच्या वेळेत घडली असती तर मोठा अनर्थ घडण्याचा धोका होता. या चढावर अशा घटना वारंवार घडत आहेत. एखाद्या व्यक्तीचा जीव गेल्यानंतरच महापालिका प्रशासन जागे होणार का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक करत आहेत.
सीएजनी बसला अपघात
यापूर्वी सीएनजी बसेस या चढावर चढत नाहीत. परिणामी त्या मागे येतात. अशीच एक बस मागे येताना ब्रेक लागला नाही व ती एका इमारतीच्या मोठ्या लोखंडी जिन्याला धडकली. एका जेसीबीचे नियंत्रण सुटून जेसिबी एका घरावर आदळला होता. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. काही वर्षांपूर्वी शाळा सुटण्याच्या वेळेस कोटेड पत्रे गाडीतून पडले होते. विद्यार्थी जीवमुठीत घेऊन या मार्गाने
प्रवास करतात.
या चढावर सातत्याने अवजड वाहने, इलक्ट्रिक वाहनांना अपघात होत आहे. रस्त्यातील हा चढ कमी करण्यासाठी महापालिका कोणाच्या परवानगीची वाट पाहत आहे हे कळत नाही. महापालिका अजून किती अपघात झाल्यावर जागी होणार आहे. चढाची तीव्रता थोडी कमी केली केली आणि रस्ता रुंदीकरण केले तर अशा घटना घडणार नाहीत.
– विशाल आहेर, सामाजिक कार्यकर्ते.
रस्ता कधी पूर्ण होणार?
चिखलीमधून कुदळवाडी ते जाधवसरकार चौक येथील रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. अजूनही हा रस्ता चिखलीपर्यंत पूर्णत्वास गेलेला नाही. संत सावता महाराज मंदिराजवळील अतिक्रमण हटविण्यात पालिकेला यश आलेले नाही. त्यामुळे या मार्गावर सातत्याने अपघात घडत आहेत. महापालिका प्रशासनाने हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.