इंद्रायणीनगर, दि. 20 (योगेश गाडगे) – पिंपरी चिंचवड महापालिकेने इंद्रायणीनगरमधील पेठ क्रमांक दोनमध्ये नवीन भाजीमंडई उभारली आहे. भाजीमंडई सुरू होऊन काही महिने होत नाहीत तोच तिची दुरवस्था झाली आहे. मंडाई परिसरात कचऱ्याचे ढीग, सर्वदूर पसरलेली दुर्गंधी व रात्रीच्या वेळी दारुड्यांचा अड्डा अशी अवस्था असल्याने नागरिकांनी प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला आहे.
पेठ क्रमांक दोन मध्ये उभारलेल्या भाजी मंडईत एकूण 72 गाळे आहेत. भाजी व्यावसायिकांसाठी 54 व 18 फळ विक्रेत्यांसाठी आहेत. भाजी धुण्यासाठी स्वतंत्र जागा, सौरऊर्जेची व्यवस्था, बाथरूम व पार्किंग सह प्रशस्थ जागेत बांधकाम पूर्ण करून भाजीमंडई सज्ज करण्यात आली होती. परंतु येथील भाजीमंडई गाळ्यांचे वाटप होऊन वर्षे होत नाही तोच येथील सोयीसुविधांची वाट लागली आहे. महापालिकेने सर्वसामान्यांचा कररुपी पैसा खर्च करून भाजीमंडई उभारली. त्यामुळे रस्त्यावर व इतरत्र भाजीविक्री करणाऱ्यांना हक्काची जागा मिळाली. परंतु येथील सोयीसुविधांकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळेच काही महिन्यांपूर्वी सुरू केलेल्या भाजीमंडईची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. या सर्व गोष्टींसाठी कारणीभूत असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. सुरक्षारक्षक असून देखील मंडईची दुरवस्था होत असेल तर येथील सुरक्षारक्षक नेमकी कोणीची सुरक्षा करत आहेत असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे. या सर्व गोष्टीची पाहणी महापालिका आयुक्तांनी करून येथील मंडईची झालेली दुरवस्था दूर करावी, अशी मागणी नागरिक व व्यावसायिक करत आहेत.
महिलांची कुचंबणा
महिलांकरिता व पुरुषांकारिता बांधलेले स्वच्छतागृह कुलूप बंद अवस्थेत आहे. तर अपंगांसाठी असलेल्या स्वच्छतागृहातील सर्व सामानांची मोडतोड झाली आहे. शिवाय स्वच्छता होत नसल्यामुळे मंडई परिसरात दुर्गंधी पसरली आहे. मंडईत येणाऱ्या महिलांची व व्यावसायिकांची मोठी गैरसोय होत आहे. स्वच्छतागृह बंद असल्याने महिलांची कुचंबणा होत आहे. तसेच महिलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
मंडई परिसरात दारूच्या बॉटल
भाजीमंडई परिसरात कचरा कुंडी आहे. त्यात दारूच्या बॉटल तर मोकळ्या परिसरात मात्र कचऱ्याचे ढीग पडले आहेत. प्रवेशाद्वार निखळून पडले आहे. त्यामुळे मंडईच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रात्रीच्या वेळी सुरक्षारक्षक असूनही येथे असून नसल्यासारखा असल्याचे बोलल्या जात आहे. स्थानिक व्यावसायिकांचे तराजू, वजनमापे तर कधी पैसे सुद्धा चोरीला गेले असल्याच्या तक्रारी आहेत.
इंद्रायणीनगर ःभाजीमंडईची काही महिन्यातच दुरवस्था झाल्याने नागरिकांसह विक्रेत्यांची गैरसोय
होत आहे.
भाजी मंडईत फळ विक्रेत्यांना सुद्धा बाहेरील जागा मिळाली आहे.पत्राशेड तयार करण्यात येतील असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र, पावसाळा संपला, उन्हाळाही जवळपास आहे. पण पत्राशेड उभे राहिले नाही. त्यामुळे फळांचे व इतर मालांचे नुकसान होत असल्यामुळे आर्थिक झळ ससावी लागत आहे.
– स्थानिक फळविक्रेता.
कचऱ्याचे साम्राज्य
इंद्रायणीनगर भाजीमंडईमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता पसरली आहे. तसेच आजूबाजूच्या परिसरात कचरा साठला आहे. त्यामुळे भाजीमंडई परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने येथील साफसफाई करावी.