पिंपरी – पिंपरी चिंचवड ही उद्योगनगरी आहे. या शहरातील कामगारांच्या कल्याणासाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ काम करते. परंतु पिंपरी चिंचवड येथील संभाजीनगर येथे असलेल्या कार्यालयाची व परिसराची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. त्यामुळे कामगार कल्याणकारी मंडळ नेमके कामगारांचे कल्याण करतेय की त्यांचे आरोग्य धोक्यात आणत आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. चिंचवड येथील संभाजीनगर भागात असलेल्या कार्यालयाच्या इमारत परिसराची स्वच्छता करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.
पिंपरी चिंचवड शहरातील कामगारांसाठी संभाजीनगर भागात कामगार कल्याण मंडळाचे कार्यलय आहे. या कार्यालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर गवत उगवले आहे. तसेच इमारतीच्या पार्किंगमध्ये व आजूबाजूला पावसाचे पाणी साचून राहत आहे. या पाण्याचा निचरा होत नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. या पाण्यामध्ये डासांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होऊन परिसरातील नागरिकांचे व कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे शांत व रहिवासी भाग असलेल्या संभाजीनगरमधील रहिवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे कामगार कल्याण मंडळाचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने इमारत बाहेरून चांगली दिसत असली तरी परिसराची मात्र दुरवस्था झाली आहे.
पावसाळ्यात या जागेत पाणी साचत आहे. या साचलेल्या पाण्यामुळे दुर्गंधी येत असून डास तसेच कीटकांची उत्पत्तीदेखील होत आहे. इमारतीच्या आवारात सुद्धा घाणीचे साम्राज्य असून अग्निशामक यंत्रणा सुद्धा दुरावस्थेत असल्याचे आढळून आले. त्यामुळे रहिवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच या साचलेल्या पाण्यात डासांचे उत्पादन होत असल्याने त्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे.
कागदपत्रांसाठी नाही सोय
संभाजीनगर सारख्या चांगल्या आणि मद्यवर्ती भागात महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कार्यालय आहे. परंतु या कार्यालयाकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने इमारतीच्या परिसरात व कार्यालयाच्या भागात दुरवस्था झाली आहे. कामगार कल्याण मंडळाच्या फाइल ठेवण्यासाठी सुसज्ज व्यवस्था नाही.
इमारतीच्या आवारात पावसामुळे मोठ्या प्रमाणावर गवत वाढले आहे. तसेच इमारतीच्या पार्किंग व परिसरात पाणी साचून राहत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून डासांची निर्मिती होत असल्याने कीटकांची उत्पत्ती होत असून रोगराई पसरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. याकडे कामगार कल्याण मंडळ व महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
– संदीप थोरात, सामाजिक कार्यकर्ते.
कामगार कल्याण मंडळाच्या वतीने कामगारांसाठी लोककल्याणकारी योजना राबविण्यात येतात. त्यामुळे या कार्यालयात कामगारांची मोठ्या प्रमाणावर रेलचेल असते. परंतु येथे येणाऱ्या कामगारांना डासांमुळे डेंगीसदृश्य अजाराचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे कामगार कल्याण मंडळाने येथील परिसराची स्वच्छता करावी.
– शिवानंद चौगुले, सामाजिक कार्यकर्ते.