पिंपरी, दि. 23 (प्रतिनिधी) – शहरात कचरा समस्या वाढतच चालली आहे. कचरा वर्गीकरण हा त्यावरचा मुख्य उपाय ठरु शकतो. महापालिका प्रशासनाने कचरा वर्गीकरणाबाबत कठोर भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. परंतु सोबतच नागरिकांच्या काही अडचणी आहेत. भटकी कुत्री ओला कचरा विस्कटून टाकतात. कचरा वेचक सुका कचरा खाली टाकतात. भंगारवाले बकेटच चोरून नेतात, अशा समस्या येत आहेत. परंतु कचरा गाडी वेळेवर आल्यास या समस्या दूर होऊ शकतात.
पिंपरी चिंचवड महापालिकेने सर्व नागरिकांना ओला आणि सुका कचरा वर्गीकरण करून देण्यास सांगितले आहे. तसेच 2 ऑक्टोबर पासून सोसायट्यांचा ओला कचरा उचलणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. महापालिकेचे कर्मचारी प्रत्येक सोसायटीमध्ये जाऊन अध्यक्षाला कचरा वर्गीकरण करून देण्यास सांगत आहेत. तसे न केल्यास सोसायटीला पाच हजार रुपये दंड आकारण्याचा इशारा देत आहेत. याशिवाय वर्गीकरण करून दिल्याशिवाय कचरा उचलणार नाही, असेही सांगत आहे.
कचरा वर्गीकरणामुळे नागरिकांच्या समोर वेगळ्या समस्या निर्माण झाल्या आहेत. नागरिकांच्या म्हणण्यानुसार पूर्वी एकत्र कचरा देत होतो तेव्हा कचरा गाडी सकाळी येत होती. मात्र आता कचरा वर्गीकरण करून द्यावा लागत असल्याने कचरा गाडी दुपारी येऊ लागली आहे. लहान सोसायटीमध्ये साफसफाईसाठी असलेली व्यक्ती ओला-सुका कचरा वेगवेगळा करून सोसायटीच्या बाहेर ठेवते. मात्र रस्त्यावरील भटकी कुत्री ओला कचरा सांडून त्यातून अन्न शोधतात. तर कचरा वेचक सुक्या कचऱ्यातील त्यांना आवश्यक ते साहित्य काढण्यासाठी कचऱ्याचा डबा ओततात. वाऱ्यामुळे हा कचरा परिसरात पसरतो. तसेच ओल्या कचऱ्याची दुर्गंधी येते. काही ठिकाणी कचऱ्याच्या बकेटच चोरून नेल्याच्या घटना घडल्या आहेत.
“”जगातील अनेक देशांमध्ये असे प्रकल्प राबविताना त्यासमोर येणाऱ्या अडचणींचा विचार केला. तसेच नागरिकांचे मतही तिथे विचारात घेतले जाते. मात्र पिंपरी चिंचवड महापालिका नागरिकांचे कोणतेही मत विचारत न घेता वर्गीकरण नागरिकांच्या माथी मारत आहे.”
– वसंत ठोबरे, ज्येष्ठ नागरिक