पिंपरी – शहरातील बहुतांश प्रमुख चौकातील सिग्नलवर भिकाऱ्यांचा ठिय्या दिसून येत आहे. त्यामध्ये तृतीयपंथी, चाकाच्या पाटावर व काखेत कुबड्या घेऊन वाहनांच्या गर्दीतून फिरणारे भिकारीही कमी नाहीत. असे प्रकार दिवस-रात्र सुरू असून येथे भरधाव वाहनांमुळे अपघात झाल्यास, याला जबाबदार कोण? असा सवाल नागरिकांतून विचारला जात आहे.
सिग्नलवर गाड्या थांबल्या की लगेच गाडीच्या काचेजवळ जाऊन याचना करणाऱ्या व रस्ता दुभाजकावर बसलेल्या भिकाऱ्यांमुळे वाहनचालकांना गाडी चालवताना कसरत करावी लागत आहे. असे चित्र शहरातील बऱ्याच चौकात दिसून येते. चौकात आलेल्या भिकाऱ्यांमुळे पोलिस व वाहनचालकांना दिवसभर मनःस्ताप सहन करावा लागतो. शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी चौक, चिंचवड स्टेशन चौक, आकुर्डीतील खंडोबा चौक, याठिकाणी भिकाऱ्यांमुळे चालकांना होणारा त्रास कायमचा आहे. विशेष म्हणजे सिग्नलवर वाहतूक पोलिस बंदोबस्ताला असताना भिकाऱ्यांचे हे प्रकार सुरू असतात.
वाहनचालकांनी पोलिसांकडे तक्रार केली की, हे पोलीस भिकाऱ्यांना हाकलतात. त्यामुळे चौकातील सर्व भिकारी काहीकाळ बाजूला जाऊन थांबतात. मात्र, त्यानंतर पुन्हा पाच ते दहा मिनिटांनी तेथे येतात. त्यामुळे पोलिसांसमोरदेखील चौकातील भिकाऱ्यांना हटवण्याचे आव्हान आहे.
अपघाताची शक्यता वाढली
वाहनांच्या वेगाची पर्वा न करता काही भिकारी चौकाच्या मध्येच बसलेले किंवा उभे असतात. तसेच रस्त्याने येत असलेल्या गाडीला हे भिकारी आडवे होऊन पैसे मागतात. मात्र, यावेळी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले तर चौकामध्येच अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तृतीयपंथीयांचा ग्रुप
मुंबई-पुणे महामार्गावरील मोरवाडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी चौकात तृतीयपंथीयांचा ग्रुप बऱ्याच दिवसांपासून भिक मागत असून जास्तीच्या रक्कमेची मागणी ते चालकांकडून करताना दिसतात. अनेकदा पैशाची जबरदस्तीने मागणी करतानाही ते दिसतात.
वाहतूक नियमन करणे हे पोलिसांचे काम आहे. भिकाऱ्यांना पोलीस हाकलून लावू शकत नाहीत. सिग्नलच्या नियमांकडे दुर्लक्ष करून सर्वसामान्य नागरिकही वाहतुकीस अडथळा निर्माण करत असतात.
– बापू बांगर, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा