- चार टप्प्यात काढणार निविदा; भोसरी विधानसभेतील सर्वाधिक कामांचा समावेश
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहराला आंद्रा, भामा आसखेड धरणातून मिळणारे पाणी पुरविण्यासाठी जलशुध्दीकरण केंद्राचे काम सुरू आहे. त्याचबरोबर उपलब्ध होणारे पाणी भोसरीसह चिखली, मोशी, चऱ्होली भागात पुरविण्यासाठी आणखी 220 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. पाणीपुरवठा विभागाकडून चार टप्प्यात ही कामे काढण्याची तयारी सुरू आहे. त्यासाठी भोसरी भागात 27 पाण्याच्या टाक्यांच्या निर्मितीसह मोठ्या जलवाहिनींचा त्यात समावेश असणार आहे.
दिवसेंदिवस पिंपरी चिंचवड शहराचा विस्तार वाढत आहे. शहरातील लोकवस्ती मोठ्या वेगात वाढत आहे. शहराची लोकसंख्या 27 लाखांच्या पुढे गेली आहे. सद्यस्थितीत शहराला पवना धरणातील 480 ते 490 एमएलडी पाणी मिळत आहे. ते पाणी पुरेसे नसल्याने सध्या शहरात दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. भामा आसखेड धरणातून दररोज 167 एमएलडी व आंद्रा धरणातून दररोज 100 एमएलडी पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. त्यासाठी चिखली येथे जलशुध्दीकरण केंद्र, तसेच दोन्ही धरणाचे पाणी चिखलीपर्यंत आणण्यासाठी पाइपलाइनचे काम काढण्यात आले आहे. त्यावर सुमारे 300 कोटींपर्यंतचा खर्च होणार आहे.
या व्यतिरिक्त उपलब्ध होणारे हे पाणी विविध भागात पुरविण्यासाठी आणखी 220 कोटींचा खर्च महापालिका करणार आहे. प्रामुख्याने भोसरी, चिखली, मोशी, चऱ्होली, दिघी या भागात ही कामे केली जाणार आहेत. शहराला मिळणारे 167 एमएलडी पाणी या भागात सुरळीतपणे पोहोचविण्यासाठी हे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी पाणीपुरवठा विभागाकडून चार टप्प्यात कामे काढण्यात येत आहे. दोन निविदा पूर्ण झाल्या असून आणखी दोन निविदा काढण्यात येणार आहेत. सुमारे 220 कोटींच्या या कामांमध्ये 27 पाण्याच्या टाक्या बांधणे, या संपूर्ण भागात मुख्य जलवाहिनी टाकणे आणि आवश्यक यंत्रणा बसविण्याचा समावेश आहे.
निघोजच्या बंधाऱ्यातून पाणी उचलणार
चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत देहू येथील बंधाऱ्यातून पाणीपुरवठा केला जाणार होता. मात्र देहू येथील बंधाऱ्यातून पाणी न उचलता आता निघोज येथील बंधाऱ्यातून पाणी उचलले जाणार आहे. त्यासाठी साडेसात किलोमिटर अंतराची जलवाहिनी टाकण्यात येणार आहे.