औरंगाबाद : महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात वटपौर्णिमा हा सण साजरा केला जातो. हा सण उद्या 14 जून ला असल्यामुळे विववाहित महिला या सणाच्या तयारीला लागल्या असताना मात्र औरंगाबादेतल्या वाळूज येथे आज पिंपळ पौर्णिमा साजरी झाली आहे. पत्नीपीडित पुरुषांनी सात जन्म काय सात सेकंदही अशी बायको नको म्हणत पिंपळ वृक्षाला उलट्या प्रदक्षिणा घातल्या आहेत.
तर विषय असा आहे की, वटपौर्णिमेला विवाहित महिला पुढची सात जन्म हाच पती मिळावा, त्याला दीर्घायुष्य लाभावे म्हणून वडाची पूजा करतात त्याला सात फेऱ्या घालून धागा गुंडाळतात. मात्र औरंगाबादेतील वाळूज येथील पत्नी पिडीत पुरुषांनी मात्र सात जन्म काय सात सेकंदही ही बायको नको म्हणून मुंजा असलेल्या पिंपळ झाडाला उलट्या 108 प्रक्षिणा घातल्यात. असे करत त्यांनी पुरुषांना त्रास देणाऱ्या महिलांचा निषेधही केला आहे. तसेच ‘सात जन्म काय सात सेकंदही ही बायको नको’ अशा घोषणा देत यमराजाकडे मनोकामना केली आहे.
औरंगाबादेत वाळूज येथील ‘पत्नीपीडित’ ही संघटना पत्निपासून त्रासलेल्या पुरुषांना मदत करते. त्यांच्या वतीने वटपौर्णिमेच्या मुहूर्त साधत ही अनोखी पिंपळ पौर्णिमा साजरी करत हे आंदोलन केले आहे. या संघटनेकडून पत्नीपीडितांसाठी हे महाराष्ट्रातील पहिले आश्रम सुरु करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यामध्ये पत्नीपीडित पुरुषांची संख्या वाढताना दिसत आहे.