नवी दिल्ली – राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या विरोधातील संघर्षाला पूर्णविराम देत असल्याचे सूतोवाच माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी शनिवारी केले. यामुळे ही घडामोड त्या राज्यात सत्तेवर असणाऱ्या कॉंग्रेससाठी दिलासादायी मानली जात आहे.
राजस्थानमध्ये चालू वर्षीच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या रणसंग्रामाच्या तोंडावर गेहलोत आणि पायलट या प्रमुख शिलेदारांमधील मतभेद मिटवण्यात कॉंग्रेसला यश आले आहे. पायलट यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीतून ती बाब स्पष्ट झाली.
कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी अध्यक्ष राहुल गांधी, पायलट आणि राजस्थानमधील प्रमुख नेत्यांची नुकतीच दिल्लीत बैठक झाली. त्या बैठकीचा संदर्भ देऊन पायलट यांनी भूमिका मांडली. माफ करा, विसरा आणि पुढे चला असे खर्गे यांनी मला सांगितले. मला तो खर्गे यांनी दिलेला सल्ला आणि आदेशही आहे, असे ते म्हणाले.
दर पाच वर्षांनी सत्ताबदल हा राजस्थानचा प्रदीर्घ राजकीय इतिहास आहे. तो बदलण्याचे मोठे आव्हान कॉंग्रेसपुढे आहे. ती बाबही पायलट यांनी मान्य केली. अर्थात, कॉंग्रेस सरकारने चांगल्या योजना आणल्या. त्यांचे जनतेने स्वागत केले आहे. भाजपला गृहकलहाने ग्रासले आहे. त्यामुळे नवा इतिहास घडवण्याच्या दिशेने कॉंग्रेसचे मार्गक्रमण सुरू आहे. मागील वेळेपेक्षाही अधिक जागा यावेळी मिळतील, अशा शब्दांत त्यांनी कॉंग्रेसच्या विजयाबद्दल विश्वास व्यक्त केला. कुठलीही एक व्यक्ती निवडणूक जिंकण्याची जादू घडवण्याचा दावा करू शकत नाही. विजयामागे सांघिक प्रयत्न असतात, असे म्हणत त्यांनी सामूहिक नेतृत्वाचे समर्थन केले.