स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच वीज पुरवठ्याचे प्रयत्न : निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पडले खांब
टाकवे बुद्रुक – देशाला स्वातंत्र्य मिळून सात दशके उलटून गेली परंतु आंदर मावळातील काही गावांच्या नशिबीचा अंधार अजून मिटला नाही. दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती या केंद्र सरकारच्या योजनेच्या माध्यमातून आंदर मावळातील कुसुर पठारावरील आदिवासी बाधवांना वीज उपलब्ध करून देण्याचे काम सुरुवातीला युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले होते. यामुळे आदिवासी बांधवांना वीज येणार असा आशेचा किरण दिसत होता. परंतु ज्या खांबांवरुन ही वीज येणार आहे आणि ते खांबच जमिनीवर आडवे पडले असून ग्रामस्थांच्या नशिबी अंधार कायम आहे.
आंदर मावळातील कुसुर पठार काब्रे पठार या दुर्गम आदिवासी भागात आजपर्यंत वीज पोहचली नसल्याने तंत्रज्ञानाच्या बाबतीत खूपच वेगाने धावत असलेल्या बाह्य जगाच्या तुलनेत हा परिसर खूपच मागे राहिला आहे. दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती या योजने अंतर्गत वीज पुरवठा करण्याचे प्रयत्न पहिल्यांदाच सुरु झाले. शिवसेना तालुका प्रमुखा राजू खांडभोर यांनी खासदारांकडे मागणी करुन या परिसरात दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजनेद्वारे वीज आणण्यासाठी पाठपुरावाही केला. केंद्र सरकारच्या या योजनेतून कामाला मंजुरीही मिळाली. सहा महिन्यांपूर्वी कामाला सुरुवातही झाली. मात्र प्रत्येक कामाप्रमाणे या कामातही दिरंगाई डोईजड झाली. काम व्यवस्थित न झाल्याने वीज वाहिन्यांना भार पेलण्यासाठी लावण्यात आलेले 30 ते 35 खांब जमिनीवर आडवे पडले आहेत.
ठेकेदाराचा हलगर्जीपणा
सहा महिन्यांपूर्वी सुरु झालेल्या या कामात ठेकेदाराचा हलगर्जी आणि निष्काळजीपणा स्पष्ट दिसून येत आहे. हे काम इतक्या तकलादूपणे जमिनीमध्ये लावण्यात आले होते. पावसाच्या फटक्याने एक-एक करत 30 ते 35 खांब आडवे झाले आणि सोबतच लवकरच वीज मिळण्याच्या आशाही धुळीला मिळू लागल्या. याबाबत ग्रामस्थांकडून रोष व्यक्त होत आहे.
केंद्र सरकारच्या दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती या योजनेतून कामाला मंजुरी मिळाली. पहिल्यांदाच या दुर्गम भागात वीज येणार आहे. परंतु ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे खांब कोसळले आणि सहा महिन्यांपासून हे काम बंद आहे. याचा फटका आदिवासी बांधवांना बसत आहे.
– राजू खांडभोर, तालुका शिवसेना प्रमुख