कंपनी ओळख
पीआय इंडस्ट्रीजची सुरुवात 1946 मध्ये राजस्थानमधील उदयपूर येथे मेवाड ऑईल अँड जनरल मिल्स नावाने झाली. त्यावेळी कंपनी खाण आणि खनिज क्षेत्रातील प्रक्रिया व्यवसायात होती. नंतर वोल्केम इंडिया लिमिटेड ही कंपनी स्थापून त्याद्वारे स्वतंत्रपणे हा व्यवसाय केला जाऊ लागला. सुरुवातीच्या काळात देशभर विपणन जाळे उभारण्यासाठी कंपनीने मेहनत घेतली. कृषी-रसायन तांत्रिक प्रकल्प उभा केला. त्याचबरोबर कृषी-रसायन उत्पादनांची निर्यातही सुरू केली. व्हेजफ्रु या ब्रॅंडखाली या उत्पादनांचे मार्केटिंग केले जाऊ लागले.
आज पीआय इंडस्ट्रीज ही कृषी-विज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. देशांतर्गत तसेच निर्यात बाजारपेठेत कंपनीने स्वतःचे ठळक अस्तित्व निर्माण केले आहे. कंपनीची तीन उत्पादन युनिट गुजरातमध्ये तर संशोधन आणि विकास केंद्र राजस्थानातील उदयपूर येथे आहे. गुजरातमधील पानोली येथे युनिटमध्ये पाच बहुविध उत्पादन प्रकल्प आहेत तर जम्बुसर येथील युनिटमध्ये तीन बहुविध उत्पादन प्रकल्प आहेत. त्याखेरीज पानोली येथे दोन फॉर्म्युलेशन युनिट आहेत. त्याद्वारे देशांतर्गत तसेच जागतिक पातळीवरील मागणी आणि गरजांची पूर्तता केली जाते.
आज ही कंपनी कृषीरसायन उत्पादनांच्या क्षेत्रातील भारतातील पहिल्या पाच अग्रगण्य कंपन्यांमध्ये गणली जाते. 1980 ते 2000 ही दोन दशके कंपनीसाठी मोठे बदल घडवणारी ठरली. याच काळात कंपनीचे नाव बदलून ती पीआय इंडस्ट्रीज या नावाने ओळखली जाऊ लागली.
पॉलिमर कम्पाउंडिंगच्या क्षेत्रातही कंपनीने पदार्पण केले. एनर्जी मीटरींगच्या क्षेत्रात कंपनीने पाऊल ठेवले. पुढे हे काम सिक्युर मीटर्स लिमिटेड या नावाने स्वतंत्र कंपनी करू लागली. गुजरातमधील पानोली येथे कंपनीने उत्पादन प्रकल्प उभारला, पश्चिम आशियात कंपनीचा प्रकल्प सुरू झाला. 2000 नंतर कंपनीने पॉलिमरच्या व्यवसायात पाऊल टाकले. उदयपूर येथील संशोधन आणि विकास केंद्राचा विस्तार केला. जम्मूमध्ये कंपनीचा फॉर्म्युलेशन प्रकल्प सुरू झाला.
कंपनी देशांतर्गत (डोमेस्टिक अग्री इनपुटस्- एआय) लागणारी पीक संरक्षक आणि पीक पोषक औषधे उत्पादित करते. त्याचबरोबर कस्टम सिंथेसिस अँड मॅन्युफॅक्चरिंग (सीएसएम) म्हणजेच एक किंवा अनेक उत्पादनांच्या निर्मितीसाठी रासायनिक क्रिया कृत्रिमरित्या घडवून आणण्यासाठी लागणारी रसायने मागणीनुसार बनवते.
कृषीरसायन क्षेत्रात कल्पकतेने काम करणाऱ्या जगभरातील कंपन्यांना हे सीएसएम पुरवण्यात येते. गुजरातमधील जाम्बुसर येथील एसईझेडमधील कंपनीचा नवा कोरा उत्पादन प्रकल्प 2013 मध्ये सुरू झाला. 2014 नंतर कंपनीने जर्मनीमध्ये कार्यालय सुरू केला. 2015 नंतर उदयपूरला अत्याधुनिक असे संशोधन आणि विकास केंद्र स्थापन केले.
बडोद्यात नवीन कार्यालय सुरू केले. जाम्बुसरला दोन जागतिक दर्जाचे बहुविध उत्पादन प्रकल्प सुरू केले. 2018 मध्ये कंपनीने ऊस पीक संरक्षक उत्पादनाच्या क्षेत्रात काम सुरू केले. त्यासाठी कोस्को ब्रॅंड लॉंच केला. त्याआधीच भातपिकासाठी उपयुक्त ठरणारा नॉमिनी गोल्ड ब्रॅंडने बाजारात ठसा उमवटला होता. आज कृषी क्षेत्रासाठी कीटकनाशके, पीक रक्षक, तणनाशक, बुरशीनाशक असे जवळपास 33 ब्रॅंड आहेत. त्याखेरीज बायोव्हिटा ग्रॅन्युएल्स, बायोव्हिटा लिक्विडी, सुपर स्प्रेडर, ह्युमेसॉल ही विशेष उत्पादने बाजारात आहेत. त्याखेरीज कंपनीतर्फे विविध सेवा पुरवल्या जातात.
शेअरबाजारात प्रथमच गुंतवणूक करणाऱ्यांना स्वाभाविकपणे रोज भाव वाढत असणाऱ्या कंपन्या आकर्षित करतात. मग ती कंपनी तोट्यात चालणारी का असेना किंवा कंपनीवर भरमसाठ कर्ज का असेना. अशा कंपन्यांच्या मागे धावून नवखे गुंतवणूकदार पैसे गमावून बसतात. दुसरीकडे कंपनीचा ताळेबंद, उलाढाल आणि निव्वळ नफा, भविष्य याचा विचार करणारा गुंतवणूकदार दीर्घकालिन परताव्याचा विचार करून गुंतवणुकीसाठी अचूक कंपनी निवडतो. तुम्ही दुसऱ्या वर्गातील गुंतवणूकदार असाल तर तुम्ही नक्कीच पीआय इंडस्ट्रीजचा अभ्यास केला पाहिजे. कंपनीचा व्यवसाय आणि त्यातील सातत्य या निकषांवरदेखील ही कंपनी सरस ठरते. गेल्या तीन वर्षात कंपनीच्या ईपीएस (अर्निंग पर शेअर) मध्ये वाढ होत आहे. दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी ही सकारात्मक गोष्ट आहे.
गेल्या तीन वर्षात पीआय इंडस्ट्रीजच्या ईपीएसमध्ये वार्षिक 12 टक्क्यांनी वाढ होत आहे. ही वाढ अर्थातच चांगली आहे आणि ती कायम राहावी अशी आशा आहे. 2020 या आर्थिक वर्षात कंपनीची उलाढाल तीन हजार 206 कोटी 80 लाख रुपये एवढी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी त्यामध्ये 16.4 टक्क्यांची वाढ आहे. वार्षिक नफा 442 कोटी 30 लाख रुपये एवढा आहे. त्यामुळे शेती क्षेत्रातील वाढ आणि कंपनीची कामगिरी लक्षात घेता या कंपनीच्या शेअरचा दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी विचार करता येऊ शकतो.
– सुहास यादव (suhasyadav@gmail.com)