मुंबई – बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियन आत्महत्या प्रकरणी आदित्य ठाकरे यांच्या चौकशीची मागणी करत मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका सादर झाली आहे.
सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टातील अशिलांच्या संघटनेचे अध्यक्ष राशिद खान पठाण यांनी ही जनहित याचिका दाखल केली असून यावर नुकतीच प्राथमिक सुनावणी हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरीफ डॉक्टर यांच्या खंडपीठापुढे झाली. लवकरच यावर सविस्तर सुनावणी होण्याची शक्यता आहे.
या याचिकेतून केंद्रीय तपासयंत्रणेतील सीबीआय अधिकाऱ्यांवरही ढिलाईनं काम केल्याबद्दल कारवाईची मागणी करण्यात आली आहे. तसेच राज्याच्या महाधिवक्त्यांना सीबीआयविरोधात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशांचा अवमान केल्याबद्दल याचिका दाखल करण्याचे आदेश देण्याची मागणीही याचिकेतून करण्यात आली आहे.
काय आहे याचिका?
दिशा सालियन आणि सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी आदित्य ठाकरेंना ताब्यात घेऊन चौकशीची का गरज आहे? हे पटवून देताना अनेक आरोप या याचिकेतून करण्यात आले आहेत. 8 जून 2020 रोजीच दिशा, आदित्य ठाकरे, राहुल कनाल, सूरज पांचोली, सचिन वाझे, एकता कपूर यांच मोबाईल लोकेशन तपासले जावे, कारण त्या रात्री हे सगळे 100 मीटरच्या परिसरात एकत्रच होते.
तसेच 13 व 14 जून 2020 रोजीचे सुशांतसिंह राजपूत, रिया चक्रवर्ती, आदित्य ठाकरे, अरबाज खान, संदिप सिंह, शौविक चक्रवर्ती या सर्वांचेही मोबाईल लोकेशन तपासले जावेत. तसेच या दोन्ही दिवसांचे आसपासच्या परिसरातील आदित्य ठाकरेंशी संबंधित सारं सीसीटिव्ही फुटेज तपासले जावे.
सुशांतचा मृत्यू झाला त्यादरम्यान आदित्य ठाकरे आणि रिया चक्रवर्ती यांच्यात 44 वेळा फोनवर काय बोलणं झालं? याची चौकशी व्हायला हवी. सुशांत आणि रियाच्या मृत्यूवर सवाल उठवणाऱ्या सर्व साक्षी पुराव्यांची सखोल चौकशी व्हावी, असेही या याचिकेत म्हटले गेले आहे.