सोरतापवाडी – गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकजुटीने हातात हात घालून काम केले पाहिजे. तरुण पिढी कुठे चुकत असेल तर तशा सुचना ज्येष्ठांनी द्याव्यात. पण गावच्या विकासात गटातटाचे राजकारण अजिबात करू नका, असा मोलाचा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला.
पेठ (ता. हवेली) ग्रामपंचायत इमारतीचे लोकार्पण, विविध विकासकामांचे उद्घाटन व महाराष्ट्रात प्रथमच पोलीस पाटील कार्यालयाचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शिरूर – हवेलीचे आमदार अशोक पवार, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, हवेली तालुकध्यक्ष दिलीप वाल्हेकर, जिल्हा परिषद सदस्या किर्ती कांचन, पेठ गावचे सरपंच सुरज चौधरी, उपसरपंच जयश्री चौधरी,रघुनाथ चौधरी, अमित कांचन, ज्येष्ठ नेते सुरेश घुले, उद्योगपती गुलाब चौधरी, काळुराम चौधरी, ग्रामविकास अधिकारी नंदकुमार चव्हाण, गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, पोलीस पाटील दत्तात्रय चौधरी यांसह तालुक्यातील आजी-माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, पेठ गावच्या नुतनीकरण इमारतीचे उद्घाटन करताना आनंद होत आहे. यापुढे पेठगावच्या विकासाला गती मिळणार असुन पेठगावच्या विकासासाठी मी, खासदार अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार सगळेजण निधीची अडचण येऊ देणार नाही. गावच्या विकास कामांमध्ये गाव कारभाऱ्यांचे अत्यंत महत्त्वाचं योगदान असते, त्यांना गावकऱ्यांनी साथ दिली पाहिजे. या इमारतीच्या माध्यमातून सामान्य जनतेच्या विकासाची कामे सुरज चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी अधिक वेगाने केली पाहिजेत. योग्य आणि कायदेशीर काम घेऊन आलेला ग्रामस्थ रिकाम्या हाताने जाणार नाही यासाठी सुरज व त्यांच्या सहकाऱ्यांनी काम केले पाहिजे. यावेळी सुरज चौधरी यांनी गावात केलेल्या विकास कामांची माहिती अजित पवार यांना दिली.
- सरपंचाच्या कामाचे तोंडभरून कौतुक
पेठ गावचे सरपंच सुरज चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या डिजिटल ग्रामपंचायतीच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले. यावेळी संपूर्ण इमारतीची पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. इमारतीच्या पाहणीनंतर ग्रामस्थांसाठी त्यांनी पाऊण तास वेळ दिला. यावरून अजित दादांना ग्रामपंचायतीचे नुतनीकरण आवडले असल्याची चर्चा पुर्व हवेलीत सुरु झाली आहे.