काही व्यक्ती या समाजाभिमुख काम करणाऱ्या असल्या तरी प्रसिद्धिपराङ्मुखही अधिक असतात. अशा व्यक्तिमत्वांचे कार्यच त्यांची ओळख देऊन जाते. समाजजीवन आणि मानवीजीवन यांची नाळ या व्यक्तींनी खऱ्या अर्थाने जोडलेली असते आणि त्या दृष्टीने त्यांनी केलेले काम हे चिरकाल टिकणारे असते. स्व. धनराजजी मालचंदजी राठी यांच्याबाबतीत असेच म्हणावे लागेल.
आपल्या कार्याकडे एका विशिष्ट दिशा-दृष्टीने पाहून धनराजजी यांचा जीवनप्रवास यशस्वी झालेला दिसून येतो. महेश नागरी मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. पुणे या संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष असलेल्या धनराजजी राठी यांचे जीवन संकटे, काटे, अडचणी आणि त्यातून झालेला खडतर प्रवास असेच आहे. प्रत्येक यशस्वी माणसाचे वलय हे या मार्गातूनच जाते आणि त्यातून सुलाखून निघाल्यावरच यशाची पायरी त्यांची वाट पाहताना दिसून येते. धनराजजी पुण्यात राजस्थानहून आले ते नशीब आजमावण्यासाठीच. लहान वयापासून त्यांनी रात्रं-दिवस कष्ट करून एका विशिष्ट स्वप्न उराशी बाळगले होते. कष्टाची साथ आणि सत्याची आस धरून त्यांनी नोकरी करण्यास सुरुवात केली. कालांतराने त्यात स्थिरता आल्यावर धनराजजी व्यवसायाकडे वळले. वेगवेगळे मसाले बनवून ते बाजारपेठेत आणले आणि यानंतर पुण्यातील कसबा पेठेत त्यांनी मिठाईचे दुकानही सुरू केले. दुकान बाजारपेठेत आणि मालाची उत्तम गुणवत्ता असल्याने या व्यवसायात त्यांना यश मिळाले.
या माध्यमातून त्यांच्या अनेक ठिकाणी ओळखी वाढल्या आणि याच दरम्यान त्यांची श्री. दुग्गड यांच्याशी ओळख झाली. त्यांच्या सान्निध्यात आल्यावर धनराजजी यांनी जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवसायास सुरुवात केली. मोकळ्या जागा घ्यायच्या, त्याचे प्लॉटिंग करायचे आणि त्या विकायच्या. त्या काळात कात्रज, धनकवडी या भागांत मोकळ्या रानमाळाच्या जागा भरपूर होत्या. अशा डोंगराळ आणि झुडपांनी वेढलेल्या जागा घेऊन त्याचे प्लॉटिंग करून विकण्याच्या व्यवसायात त्यांनी अल्पावधीतच यश प्राप्त केले. या व्यवसायातूचे पुढे डी. एम. राठी डेव्हलपर्स, राठी कन्स्ट्रक्शन या कंपन्यांना मूर्त स्वरूप आले. बांधकाम क्षेत्रात रोजगाराच्या मोठ्या संधी होत्या, हे लक्षात घेऊन त्यांनी या क्षेत्रात पाय रोवले. अनेक मजुरांना या निमित्ताने रोजगार मिळाला. या काळात डी. एम. राठी हे नाव पुण्यात एक वेगळा ठसा उमटवून गेले.
याच्या पुढचे यश पादाक्रांत करण्यासाठी त्यांच्यासाठी खरोखरच दरवाजे उघडे होते आणि महेश बॅंकेच्या संचालकपदी त्यांची 1987 मध्ये निवड झाली. या संस्थेच्या विकासाचा ध्यास प्रामाणिकपणाच्या बळावर त्यांनी घेतला आणि 1996 मध्ये ते या बॅंकेच्या उपाध्यक्षपदी विराजमान झाले. या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक दुर्बल घटकांना आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने त्यांनी 1998 मध्ये महेश नागरी पतसंस्थेची स्थापना केली. संस्थेचे संस्थापक-अध्यक्षपदी काम करताना त्यांच्या प्रगतीचा आलेख हा कायमच चढता राहिला आणि पुण्यापुरतेच किंवा महाराष्ट्रापुरते मर्यादित असलेले हे काम पुढे राज्याबाहेर त्यांनी नेले आणि त्यांच्या या संस्थेचे महेश नागरी मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. या नावात रूपांतर झाले. या संस्थेची शाखा राजस्थानातील जोधपूरमध्ये सुरू करण्यात आली.
माहेश्वरी समाजाचे असलेल्या धनराजजी यांनी समाजासाठीही मोठे कार्य केले ते “माहेश्वरी चॅरिटेबल फाउंडेशन’च्या माध्यमातून. ते या फाउंडेशनचे कार्याध्यक्ष होते आणि नंतर संचालक मंडळावरही होते. समाज आणि धर्म यांतील एक महत्त्वाचा दुवा ते ठरले. कसबा पेठेतील राधा-कृष्ण मंदिराचे अध्यक्ष, सुखसागरनगर येथील आंबा माता मंदिराचे अध्यक्ष, जोधपूरच्या श्री नागणेशाय माता मंदिराचे ट्रस्टी ते होते, तर दरिया येथील तिरुपती मंदिराची स्थापनाही त्यांनी केली. अनाथाश्रमापासून अनेक सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रांतील गरीब गरजूंना सढळ हातांनी मदत करणारे धनराजजी यांचे कार्य अतुलनीय असेच होते. “कष्टाला तोड नाही’ हे सूत्र त्यांनी स्वीकारले होते; पण त्याचबरोबर प्रामाणिकपणा, कामातील सातत्य आणि दूरदृष्टी या त्रिसूत्रीच्या माध्यमातून त्यांची एक यशस्वी आदर्शवत वाटचाल दिसून आली आहे.