कॉंग्रेसमधून उठली टीकेची झोड
नवी दिल्ली – प्रभावी तरूण नेते ज्योतिरादित्य शिंदे यांच्या राजकीय बंडामुळे अस्वस्थ झालेल्या कॉंग्रेस पक्षातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली. ज्योतिरादित्य यांच्या निर्णयामागे व्यक्तिगत महत्वाकांक्षा आणि राजकीय सोय या बाबींनी महत्वाची भूमिका निभावली, असे कॉंग्रेसचे लोकसभेतील नेते अधिररंजन चौधरी यांनी म्हटले.
ज्योतिरादित्य यांच्या राजकीय वाटचालीत कॉंग्रेसचे मोठे योगदान आहे. पक्षाने त्यांच्यावर महत्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या. त्यामुळे त्यांचा राजीनामा पक्षाच्या दृष्टीने वेदनादायी वृत्त आहे. अर्थात, ज्योतिरादित्य यांना विचारसरणीचे महत्व वाटत नसावे. अन्यथा, त्यांनी पक्ष सोडला नसता. भाजपच्या प्रलोभनामुळे त्यांनी कॉंग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असू शकतो, असे अधिर यांनी म्हटले.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही ज्योतिरादित्य यांच्यावर निशाणा साधला. ज्योतिरादित्य यांनी जनतेशी आणि विचारसरणीशी विश्वासघात केला. त्यांच्यासारखे नेते सत्तेशिवाय राहू शकत नसल्याचे सिद्ध झाले. तशाप्रकारचे नेते लवकर बाहेर पडलेलेच चांगले. केंद्रात सत्तेवर असणाऱ्या भाजपकडून अर्थव्यवस्था, लोकशाही संस्था, सामाजिक सलोखा आणि न्याययंत्रणेवर घाला घातला जात आहे. अशा राष्ट्रीय पेचाच्या काळात भाजपशी हातमिळवणी केल्याने राजकीय महत्वाकांक्षाच उघड होतात, अशी टिप्पणी त्यांनी केली.
युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही. यांनी ज्योतिरादित्य यांची कॉंग्रेसमधून हकालपट्टी केल्याबद्दल पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांचे आभार मानले. पक्षापेक्षा कुठलीही व्यक्ती मोठी नाही, असे त्यांनी म्हटले.