Devendra Fadnavis – महाराष्ट्रातून दर वर्षी कोयनेतून ४ टीएमसी पाणी चिकोडी, बागलकोट आणि विजापूरला सोडण्यात येते. तसेच ४ टीएमसी पाणी कर्नाटकने अलमट्टी धरणातून सोलापूर आणि जतसाठी दरवर्षी सोडावे, अशी महाराष्ट्राची मागणी आहे.
महाराष्ट्र कर्नाटकला उदार मनाने पाणी देतो. मात्र कर्नाटक महाराष्ट्राला पाणी देताना नेहमी खळखळ करतो. हे लक्षात घेता महाराष्ट्र-कर्नाटकात कायम स्वरूपी पाणीवाटप करार करण्याचे प्रयत्न असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्षवेधीवरील चर्चेच्या उत्तरात दिली.
जयंत पाटील यांनी कोयना धरणातील ३७.५० टीएमसी पाणी सांगली जिल्ह्यात सोडण्यात यावे अशी मागणी केली. यावर समाधान अवताडे यांनी सोलापूरलाही पाणी सोडण्याची मागणी केली. त्यावर फडणवीस यांनी सातारा आणि सांगली जिल्ह्याच्या कुस्तीत सोलापुरचे नुकसान होऊ देणार नाही, असे सांगितले.
सांगली व साताऱ्याचा हा प्रश्न कर्नाटकपर्यत गेला. दरवर्षी कृष्णा नदीच्या काठावरील गावांना उन्हाळ्यात भेडसावत असणारी पाणी समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकार बरोबर पाणी वाटप करार करण्यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे. यासाठी नाना पटोले व पृथ्वीराज चव्हाण यांची मदत घेऊ असे फडणवीस म्हणाले.
दर वर्षी महाराष्ट्रातून उन्हाळ्यात कर्नाटकातून वाहणाऱ्या कृष्णा नदीच्या पात्रात चार टीएमसी पाणी सोडण्यात येते. २००४ पासून २०१७ पर्यंत कर्नाटकने महाराष्ट्राकडून पाणी विकत घेतले आहे. यापुढे पाणी वाटप करार करून दोन राज्यातील पाणी समस्या निवारण्यासाठी सरकार तयार आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.