दत्तात्रय गायकवाड
वाघोली – हवेली तालुक्यातील ग्रामीण भागात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुकांसह लोकप्रतिनिधी, गावनेत्यांनी शांततेत क्रांती करीत विविध कार्यक्रम, यात्रा, जत्रांमधून आगामी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. निवडणुकासाठी लांबणीवर पडल्या असल्यास तरी ओबीसी आरक्षण, तसेच आपल्या गण, गटात कोणती गावे समाविष्ट होणार याकडे सर्वपक्षीय गावनेत्यांचे लक्ष लागले आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्ये आरक्षित जागा कोण कोणत्या गण, गटामध्ये असणार आहे. त्या आरक्षणानुसार अनेकांनी निवडणुकीसाठी तयारी देखील केली आहे. गण, गटाची पुनर्रचना होत असताना तेथील संभाव्य आरक्षण लक्षात घेऊन निवडणुकीसाठी अनेकांनी मोर्चेबांधणी देखील करायला सुरूवात केली आहे.
हवेलीच्या ग्रामीण भागात सध्या महिलांना विशेष प्राधान्य प्राप्त झाले आहे. महिलांचा राजकीय कल लक्षात घेऊन अनेक ग्रामपंचायत सदस्य पदापासून सरपंच पदापर्यंत कार्यरत असणाऱ्या तसेच यापूर्वी कार्यरत असलेल्या अनेक महिला जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी जनमताचा कौल आजमावणार आहेत. महिला बचत गट तसेच विविध सामाजिक संस्थांच्या महिला प्रतिनिधींनी देखील निवडणुकीवर लक्ष ठेवून मतदारसंघात महिलांच्या गाठीभेटीवर भर दिला आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये ग्रामीण भागात असणारी तरुण मंडळे, विविध प्रतिष्ठान, तरुणांचे गट आगामी निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावताना मोलाची कामगिरी बजावणार आहेत. कार्यकर्त्यांची फौज तसेच सामान्य मतदारांना मतदानाचा हक्क बजावताना संबंधित उमेदवारासाठी योग्य प्रचार यंत्रणेचे माध्यम तरुणांचे गट ठरणार आहेत.
प्रत्येक गावांमधील असणारे प्रश्न सोडवण्यासाठी उमेदवारांची दमछाक होणार आहे. अनेक भागांमध्ये यापूर्वी समस्या सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींकडून मिळाली आश्वासने व त्या समस्यांची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्या सोडवण्यासाठी आगामी काळात इच्छुकांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. समस्या सोडवू इच्छिणारा तसेच नागरिकांच्या विश्वासास पात्र राहणारा उमेदवार निवडणुकीत विजयाचा शिलेदार ठरणार आहे.
मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर व सर्व चित्र स्पष्ट झाल्यानंतर त्या-त्या गण, गटाचा जनमत कौल लक्षात घेऊन उमेदवार निश्चित होणार आहे. पक्षातील वरिष्ठ स्तरावरील नेते यासंदर्भातील निर्णय घेणार आहेत. पण राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्व कार्यकर्ते तयारीला लागले आहेत.
– रामभाऊ दाभाडे, नेते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष
गावोगावी असणाऱ्या विविध समस्या सोडवण्यासाठी भाजपच्या वतीने प्रयत्न केले गेले आहेत. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आंदोलनाच्या माध्यमातूनदेखील प्रयत्न झाले आहेत. जिल्हा व राज्य स्तरावरील नेतृत्वाच्या वतीने उमेदवार निश्चिती होणार आहे. नागरिकांचा विश्वास संपादन करून भाजप आगामी निवडणुकीत विजयाची मुहूर्तमेढ रोवणार आहे.
– गणेश कुटे, भाजप नेते