माझ्यावर प्रेम करणारी, मला श्रीमंत करण्यासाठी टपलेली माणसं जगभर पसरली आहेत. मोबाइल फोन सुरुवातीला महाग होते तेव्हाची गोष्ट. मी दिवाळीच्या फेस्टिव्हल ऍडव्हान्समधून वट्ट दोन हजार रुपये मोजून पहिला मोबाइल घेतला होता. त्यामुळे त्या वर्षी आमची दिवाळी साधेपणाने साजरी झाली. माझ्या या दुःखाची बातमी जगभर पसरली असणार. कारण थोड्याच वर्षांनी मला एसएमएस येऊ लागले की तुमचा फोन नंबर अमुक योजनेत पाच हजार डॉलर्स बक्षिसाला पात्र ठरला आहे, वगैरे. पण त्या डॉलर्सचे रुपये कसे करतात हे ठाऊक नसल्याने मी एसएमएसकडे दुर्लक्ष केले.
आपण त्या प्रेम करणाऱ्या माणसांनी माझ्याकडे दुर्लक्ष केले नाही. एकदा मला एक लाडिक फोन आला, मी विजय सरांशी बोलू शकते का? मी होकार दिल्यावर तिने सांगितले की माझी एक विमा पॉलिसी आहे आणि त्या पॉलिसीचे मला सत्तर लाख रुपये मिळणार आहेत. मी तिला पैसे घेऊन घरीच पोहे आणि चहाला बोलावलं. पण ती आली नाही. काही काळाने दुसऱ्या लाडिक आवाजाने फोन केला की मला विमा पॉलिसीचे एक कोटी रुपये मिळणार आहेत. हा फोन आला तेव्हा बायको भाजी आणायला गेली होती. म्हणून मी चहा-पोहे ही ऑफर न देता धाडसानं म्हटलं की पुण्यात माझं घर आहे. एक कोटी रुपये मिळाले तर काय करायचं हा प्रश्न आहे. पण एक कोटी रुपये घेऊन तू घरी ये. आपण लग्न करू आणि सुखाने संसार करू. त्यानंतर तो लाडिक फोन पुन्हा कधीच आला नाही.
मधल्या काळात मी संगणक विकत घेतला. इंटरनेट कनेक्शन घेतले. ही बातमी देखील जगभर पसरली. परवा मला एक पत्र- म्हणजे ईमेल आले. त्यात नेहमीचा मजकूर होता. दूर कुठल्या तरी देशात एक धनाढ्य विधवा राहते. तिच्या पतीने मरताना तिला अवाढव्य धनसंपदा दिली. मूलबाळ दिले नाही. ती आता म्हातारी झाली आहे. तिला असे वाटते की ही इस्टेट गरजू व्यक्तीला द्यावी. जगाच्या पाठीवर शोध घेतल्यावर तिला मीच (बरा) सापडलो. तिने मला ईमेलद्वारे कळवले की तुला मी लवकरच- म्हणजे डोळे कायमचे मिटण्याआधी- पन्नास मिलियन डॉलर्स देणार आहे.
ईमेल वाचून मी तत्काळ पन्नास मिलियन म्हणजे पाचावर किती पूज्ये हे शोधले. तूर्त आपला रुपया सतत घसरतो आहे हे लक्षात घेऊन पन्नास मिलियन उर्फ पाच कोटी या आकड्याला सत्तरने गुणून पाहिले. अबब. किती मोठी रक्कम. यात मी रोज दोन लिटर महागडे दूध घेतले, दरमहा पाच किलो कांदे घासाघीस न करता घेतले, ग्राहक पेठेत रिक्षाने जाऊन दरमहा दोन किलो साजूक तूप, पाच किलो महागडे ऑलीव्ह तेल वगैरे चांगलेचुंगले सामान आणले… दर रविवारी सकाळी मिसळ खायला देखील रिक्षाने गेलो, न लाजता एक्स्ट्रा पाव घेतला, बायकोला स्वयंपाकाचा कंटाळा आल्यावर हॉटेलमध्ये जेवेन. सखुबाईचा पगार वाढवून दरमहा पंचवीस हजार करीन. सकाळी फिरायला गेल्यावर कटिंग चहाऐवजी फुल चहा पिता येईल. इडली-वडा सांबार खाताना एक्स्ट्रा चटणी-सांबारचे जादा पैसे पडतात. चटणी-सांबार पुरवून पुरवून खावे लागते. आता तसे करायची गरज नाही. मी कितीही (आणि वाईट) कविता लिहिल्या तरी मी पैसे दिल्यावर प्रकाशक त्या झोकदार समारंभात प्रकाशित करतील. कार्यक्रमात सर्व श्रोत्यांना वडापाव आणि चहा देतील. मला दाद देणाऱ्या रसिक सुंदर मैत्रिणींच्या वाईट कविता देखील छापण्यासाठी मी प्रकाशकांना पैसे देईन. तरीही मरताना माझ्याकडे खूप पैसे शिल्लक राहतीलच.
त्या बयेला होकार कळवायच्या आधी मी आमच्या सहकारी बॅंकेत गेलो. तिथल्या ब्रॅंच मॅनेजरना सांगितले की मी तुमच्याकडे साडेतीन हजार लक्ष रुपये मुदत ठेवीत ठेवणार आहे. त्यांनी माझे आभार मानायला हवे होते. चहा द्यायला हवा होता. पण त्यांनी मला बसवून ठेवले. माझ्या घरी फोन करून कुटुंबियांना बोलावून घेतले आणि मला तत्काळ दवाखान्यात न्यायचा सल्ला दिला. मी त्या बयेला उत्तर दिले की एवढे पैसे मला लगेच नकोत. लागतील तसे मी मागून घेईन. तूर्त खूप कडकी आहे. हजार रुपयांची मनी ऑर्डर पाठव. त्या मनी ऑर्डरची वाट बघतोय…
विजय तरवडे