बालिया: लोक व्यवस्थीत कपडे घालून हिंडत आहेत ते पाहिले तर देशात मंदी आहे असे कोण म्हणेल असे भीषण वक्तव्य भाजपचे खासदार विरेंद्रसिंह यांनी रविवारी येथील एका कार्यक्रमात बोलताना केले त्याचे आता तीव्र पडसाद उमटत आहेत. ते म्हणाले की लोक धोती आणि कुर्ता परिधान करीत आहेत, जर आर्थिक परिस्थिती खराब असती तर लोकांनी कपडे घातले असते काय असा विक्षिप्त सवालही त्यांनी यावेळी केला.
ते म्हणाले की जगात आज मंदीचे वातावरण असले तरी भारतात कोठेही मंदी नाही. आपली ग्रामीण आणि कृषी अर्थव्यवस्था मजबूत आहे असा दावाहीं त्यांनी केला. जर देशात मंदी असती तर आज येथे आलेले लोक कपडे घालून आले असते काय असा सवाल त्यांनी केला. जर आर्थिक मंदी असती तर लोकांनी कपडे, पॅंट, पायजमे खरेदी केले असते काय असेहीं ते म्हणाले.
देशातील काही महानगरे म्हणजे देश नव्हे, भारतात साडे सहा लाख खेडी आहेत. तोच खरा भारत आहे. आणि खेडे गावातील लोकच बॅंकांमध्ये जास्त पैसा ठेवत असतात असा बॅंकांचाच अहवाल आहे अशी टिपण्णीही त्यांनी केली.महात्मा गांधी, डॉ हेडगेवार, शामाप्रसाद मुखर्जी, जयप्रकाश नारायण यांनी देशांतील गावांवर जादा विश्वास व्यक्त केला होता. त्यांनीच देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आहे असेही ते यावेळी म्हणाले. गावांमधील नागरीकांना त्याग केला नसता तर देशाला स्वातंत्र्यच मिळाले नसते अशी पुष्टीही त्यांनी जोडली.