औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. त्यांच्या या सभेकडे सर्व राज्याचे लक्ष लागले आहे. मात्र राज ठाकरेंच्या सभेआधीच शिवसेनेकडून त्यांच्यावर टीका केली आहे. शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी,”स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्याशी कोणीही बरोबरी करू नये असा टोला राज ठाकरेंना लगावला आहे. तसेच सभेसाठी पैसे देऊन लोकांना बोलावले जात आहे असा आरोप केला आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना खैरे यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. यावेळी त्यांनी,“औरंगाबाद हा शिवसेनेचा गड असून हा गड स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केला आहे. शिवसेनेचे पानिपत करण्याची हिंमत कोणामध्येच नाही, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्याशी कोणीही बरोबरी करू नये,” असे चंद्रकांत खैरे म्हणाले आहेत.
मनसेच्या सभेवर टीका करताना ते म्हणाले की, “राज ठाकरे यांच्या सभेसाठी भाजपा मदत करत आहे. या सभेसाठी नागरिकांना पैसे देऊन सभा ऐकण्यासाठी बोलवण्यात येत आहे”. “राज ठाकरे यांच्या सभेला कितीही नागरिक आले तरी त्याचा काहीही फायदा होणार नाही. कारण औरंगाबाद जिल्हा शिवसेनेचा गड आहे आणि तो शिवसेनेचाच गड राहील,” असे चंद्रकांत खैरे म्हणाले.
सुभाष देसाई यांनी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने औरंगाबादमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, “बाबरी मशीद पाडल्यानंतर भाजपा, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद कोणीही जबाबदारी घ्यायला तयार नव्हतं. त्यावेळी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळी बाबरी मशीद शिवसैनिकांनी पाडली असेल तर याचा मला अभिमान आहे म्हटलं होतं. बाबरी मशीद पाडण्याची जबाबदारी सर्वप्रथम शिवसेनेने घेतली होती. त्यामुळे हिंदुत्ववादी कोण आहे हे शिवसेनेला सांगायची गरज नाही”.