नगर -मागील वर्षी दुष्काळी परिस्थिती मध्ये नगर तालुक्यात शासनाने सुरू केलेल्या जनावरांच्या छावण्यांचे देयके वर्ष होऊन गेले तरी अद्याप मिळालेली नाहीत. या संदर्भात भाजप नगर तालुक्याच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदासजी बेरड, तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे यांच्यासह पोपट शेळके, सचिन लांडगे, राजू दारकुंडे सुभाष निमसे, महेश लांडगे, अनिल शेडाळे आदी उपस्थित होते. यावेळी प्रा.बेरड म्हणाले की, भाजप सरकारने मागील वर्षी दुष्काळ परिस्थितीमध्ये चारा छावण्यासुरु करुन पशुपालक शेतकऱ्यांना दिलासा दिला. भाजप सरकारच्या काळात सुरुवातीला काही प्रमाणात बील पण अदा केले परंतु, त्यांच छावणीचालकाचे बील देण्यास सध्याचे महाविकास आघाडीचे सरकार टाळटाळ करत आहे.
सध्याच्या करोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी अडचणीत असताना निवेदनाची दखल घेऊन छावणी चालकांचे देयके लवकरात लवकर देण्यात यावी. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालय येथे छावणी चालकांसह आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.