पवन मावळ – पिंपरी-चिंचवडसह मावळवासियांची तहान भागविणाऱ्या पवना धरणात 93 टक्के पाणीसाठा झाला आहे. धरण पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस होत असल्याने धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे धरणातून 1400 क्युसेकने पाण्याचा गुरूवार (दि.3) पासून विसर्ग करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नदी काठच्या नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड शहराला पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. पावसाने ओढ दिल्याने या धरणातील पाणीसाठा 17 टक्क्यांवर पोचला होता. मात्र, लांबलेल्या मान्सूनने मात्र, जूनअखेर म्हणजे 29 जूनपासून जिल्ह्यात हजेरी लावली. 1 जूनपासून धरण क्षेत्रात 1 हजार 918 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरण परिसरात आताही पावसाची संततधार सुरू आहे.
पवना धरण 93 टक्के क्षमतेने भरल्यामुळे विजनिर्मिती ग्रुहद्वारे पवना नदीमध्ये गुरूवारी सकाळी 11 वाजल्या 1400 क्युसेकने विसर्ग करण्यात करण्यात आला आहे. तसेच धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण पाहता येत्या 24 ते 48 तासांमध्ये पवना धरणाच्या सांडव्यावरून पवना नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळ पवना नदी काठच्या सर्व नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये, नदीमधील पाण्याचे पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावे, असे आवाहन उपअभियंता अशोक शेटे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
दरम्यान, गुरूवारअखेर 1 हजार 581 मिमी पाऊस पडला होता. तर धरणात 81.30 टक्के पाणीसाठा होता. यावर्षी 93 टक्के भरले असल्याने शहरवासियांच्या वर्षभराच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.