बंगळुरू – कर्नाटकमधील काही नेत्यांच्या पक्षबदलामुळे भाजपच्या कामगिरीवर परिणाम होणार नाही. भाजप सत्ता राखेल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी व्यक्त केला. भाजप सोडून जाणारे जिंकत नाहीत असा पक्षाचा इतिहास आहे. ते यावेळीही सिद्ध होईल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
कर्नाटकमधील यावेळची विधानसभा निवडणूक सत्तारूढ भाजपसाठी सोपी नसल्याचे मानले जाते. अशात माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांच्यासारख्या काही नेत्यांनी भाजपला रामराम ठोकून कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.
त्यामुळे भाजपसमोरील आव्हानाची तीव्रता वाढल्याचे मानले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर, एका मुलाखतीत बोलताना शहा यांनी पक्षबदलूंना फारसे महत्व देण्याचे टाळले. काही नेत्यांनी भाजप सोडला असला तरी कार्यकर्ते आणि मतदार भाजपबरोबरच आहेत, असे त्यांनी म्हटले.
मानहानीच्या खटल्यात दोषी ठरल्याने कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाली. त्यावरून कॉंग्रेस मोदी सरकारला लक्ष्य करत आहे. त्या टीकेचा समाचार शहा यांनी घेतला. राहुल यांना आम्ही ओबीसींचा अनादर करण्यास सांगितले नाही. त्या अनादराबद्दल माफी न मागण्याचा निर्णय त्यांनीच घेतला.
केंद्रात कॉंग्रेसचे सरकार असताना बनलेल्या कायद्यानुसार ते दोषी ठरले. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पदावर असताना तो कायदा मागे घेण्याचा प्रयत्न केला. पण, राहुल यांनी त्याविषयीचा अध्यादेश फाडला. देशात कुणीही कायद्यापेक्षा मोठा नाही; राहुलही नाहीत, अशी भूमिका त्यांनी मांडली.