नवीदिल्ली – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांवर आज ५ सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी सुरु झाली. यावेळी ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल आणि मनू सिघवी यांनी तब्बल दोन तास जोरदार युक्तिवाद केला. यावेळी सिब्बल यांनी आमदारांच्या अपात्रतेबाबत तसेच निवडणूक आयोगाने पक्षचिन्हाबाबत निर्णय घेण्यासंबंधीच्या बाबींवर आपली बाजू मांडली. त्याला शिंदे गटाच्या वकिलांनी देखील प्रतियुक्तीवाद करून उत्तर दिले.
पक्ष चिन्ह ही काही आमदारांची संपत्ती नाही, हा निवडणूक आयोगाचा निर्णय आहे. पण आमच्याकडे तो वापरण्याचा कायदेशीर अधिकार आहे. निवडणूक आयोगाला दिलेल्या अधिकाराचा वापर करून न्यायालयाने निर्णय घ्यावा अशी तुमची इच्छा आहे. मी तुम्हाला काही निर्णय दाखवतो असा युक्तिवाद शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनी यावेळी केला.
सुनावणीदरम्यान नायायालयाने केवळ १० मिनिटांचा ब्रेक घेतला होता शिंदे गटाच्या वकिलांचा मुद्दा ऐकून घेतल्यानंतर लंच ब्रेकची घोषणा करण्यात आली. आजच्या या सुनावणीकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. अद्याप सुनावणीदरम्यान शिंदे गटाचे वकील आणि निवडणूक आयोगाने आपली पूर्ण भूमिका मांडणे बाकी आहे. त्यामुळे आजची सुनावणी लांबण्याची शक्यता असून आज निकाल येणार की नाही हे पहावं लागणार आहे.