मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह अँटिलिया आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एनआयएच्या तपासाला सामोरे जात आहेत. पण, अनेक वेळा समन्स देऊनही परमबीर सिंह चौकशी आयोगासमोर हजर झाले नाहीत. यामुळे आता ते देश सोडून रशियाला गेल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यावर महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. “केंद्रीय गृह मंत्रालयासोबतच आम्ही देखील परमबीर सिंह यांना शोधत आहोत. मी ऐकलं की ते भारताबाहेर गेले आहेत. पण एक सरकारी अधिकारी म्हणून ते सरकारच्या परवानगीशिवाय परदेशात जाऊ शकत नाहीत”, असे वळसे पाटील म्हणाले. परमबीर सिंह रशियात असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. त्यावर गृहमंत्री बोलत होते.
दरम्यान, परमबीरदरम्यान, परमबीर सिंह यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस काढल्याचं त्यांनी सांगितलं. “आम्ही परमबीर सिंह यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस काढली आहे. आणि जर ते भारताबाहेर गेले असतील, तर ती चांगली बाब नाही”, असे देखील वळसे पाटील म्हणाले. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या खंडणी वसुलीचा आरोप केल्यावर परमबीर सिंग हे देशभर प्रसिद्धीच्या झोतात आले. राज्य सरकारने कारवाईच्या दृष्टीने पावले टाकल्यावर परमबीर सिंद यांनी मुंबई सोडून चंडीगडमध्ये आश्रय घेतला होता. वैद्यकीय कारणास्तव सिंह सुट्टीवर आहेत. या काळात त्यांनी चंडीगडमधील डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र पाठवल्याचे सांगण्यात येत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, गृहविभाग मे महिन्यापासून परमबीर सिंग यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. ५ मे रोजी परमबीर सिंग सुट्टीवर गेले होते. परमबीर सिंग यांच्याविरोधात मुंबई आणि ठाण्यात एकूण पाच एफआयआर दाखल असून यापैकी तीन प्रकरणांचा तपास सीआयडी करत आहे. सीआयडी आणि ठाणे पोलिसांनी परमबीर सिंग यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी केली आहे.