पुणे – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्यांपैकी प्रमुख धरण असलेले पानशेत धरण रविवारी 100 टक्के भरले. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर लक्षात घेता धरणाच्या विद्युत निर्मिती केंद्राद्वारे सायंकाळी 7 वाजता 650 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला. पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग पुन्हा कमी-जास्त करण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील खडकवासला, पानशेत, टेमघर आणि वरसगाव या चारही धरणांतील पाणीसाठा एकूण 90 टक्के म्हणजेच जवळपास 26.44 टीएमसी इतका आहे. गतवर्षी याच तारखेला पाणीसाठा 28.50 टीएमसी इतका होता. तथापि, सध्या पानशेत धरण परिसरात पावसाचा जोर वाढल्याने, धरण शंभर टक्के भरला होता. आठवड्यापूर्वी याच धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला. मात्र पावसाने विश्रांती घेतल्याने विसर्ग बंद होता.