पुणे: भारतातील कर्करोगाच्या रुग्णांची संख्या २०२५ मध्ये १५.७ लाखांपर्यंत वाढण्याची शक्यता आता भेडसावू लागली आहे. अशावेळी प्रभावीपणे राबवल्या जाणाऱ्या वेदना व्यवस्थापन उपाययोजनांची आता अधिक निकडीने गरज भासू लागली आहे. यातच पुण्यातील पेनेक्स क्लिनिक आणि पेनेक्स फाऊंडेशन च्या पुढाकाराने ‘पेन-फ्री कॅन्सर’ म्हणजेच वेदनारहित कर्करोग या उपक्रमाची सुरुवात केली गेली आहे. कर्करोगग्रस्त रुग्णांच्या जीवनावर वेदनांचे सावटही येऊ नये, अशी या उपक्रमामागची संकल्पना आहे. कर्करोगग्रस्त रुग्णाचे जगणे सुसह्य व्हावे यासाठी निरनिराळ्या उपाययोजना राबवणाऱ्यांमध्ये पेनेक्स अग्रक्रमावर आहे. त्याचबरोबरीने, पेनेक्सच्या माध्यमातून कर्करोगग्रस्तांसाठी सर्वसमावेशक वेदनाशामक धोरणांची नितांत गरज पुन्हा एकदा अधोरेखित केली जात आहे.
यामध्ये जागरूकता वाढवणे, सर्वांगीण वेदना व्यवस्थापन धोरणांची आखणी करणे, आरोग्यविषयक तज्ञांशी चर्चा करणे, जास्तीत जास्त सपोर्ट नेटवर्क्सची स्थापना करणे, धोरणात्मक सुधारणांना समर्थन देणे, काळजीवाहू भूमिका विस्तारणे आणि रुग्णांना त्यांच्या वेदनाशामक उपचारांसाठी सक्रियपणे सहभागी होण्यासाठी सक्षम करणे याचा समावेश आहे. याच्याच आधारे, हा उपक्रम एक असे सक्षम वातावरण निर्माण करेल, जिथे वेदनांचा जोर कमी झाला असेल, जगण्याचा दर्जा सुधारला असेल आणि कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी हा खडतर प्रवास अधिक चिकाटी आणि दिलासादायक पद्धतीने पार करता येईल अशा स्वरूपाचे पाठबळही उपलब्ध करून दिले जाईल.
पेनेक्स क्लिनिकमधील मणकातज्ञ तसेच वेदना व्यवस्थापनतज्ञ डॉ. निवेदिता पागे सांगतात, “वेदना-मुक्त कर्करोग’ या उपक्रमामागे असलेले आमचे ध्येय हे कर्करोगाशी बिकट लढा देत असलेल्या रुग्णांना सकारात्मक प्रकाश दाखवणे हेच आहे. कर्करोगग्रस्त रुग्ण आधीच अत्यंत खडतर परिस्थितीला तोंड देत असतात. अशावेळी त्यांना वेदनांचे अधिकचे ओझे जाणवायला नको. प्रत्येक व्यक्तीला वेदनांपासून सुटका मिळवण्याचा अधिकार आहे, यावर आमचा प्रचंड विश्वास आहे. योग्य वैद्यकीय कौशल्य, सहानुभूतीची भावना आणि जागरुकता वाढवणाऱ्या शिक्षणाच्या आधारावर रचलेला हा बहुआयामी दृष्टिकोन साध्य करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.आम्ही सपोर्ट नेटवर्क म्हणजेच आधार आणि समर्थनाचे असे जाळे विणत आहोत, जे फक्त शारीरिक अस्वस्थता दूर करण्यापुरतेच मर्यादित नसून, कर्करोगाला तोंड देणाऱ्या रुग्णांचे मनोधैर्य वाढवणे, त्यांच्यात चिकाटी आणि आशेचे बीज पेरणे असाही एक उद्देश अंतर्भूत आहे.”
सध्या दिवसेंदिवस देशभरात कर्करोगाचे प्रमाण अविरत वाढतेच आहे. त्यामुळे कर्करोगग्रस्त रुग्ण, वैद्य आणि आरोग्य सेवा प्रणालींसमोर बरीच मोठी आव्हाने गंभीररीत्या उभी राहिली आहेत. याबद्दल उपलब्ध असलेली आकडेवारीही बरीच धक्कादायक आहे. या आकडेवारीनुसार, एक कटू वास्तव पुनःपुन्हा अधोरेखित होताना दिसत आहे. ते म्हणजे अनियंत्रित वेदनांचा जाच. कर्करोगग्रस्त रुग्णांना अधिक दुर्बळ बनवणाऱ्या या गंभीर पैलूकडे सगळ्यांनीच लक्ष देणे नितांत गरजेचे आहे.
पेनेक्स क्लिनिकचे वेदना व्यवस्थापनतज्ञ डॉ. काशिनाथ बांगर यांच्या मते, “कर्करोगामुळे केवळ शारीरिक आव्हानेच येतात असे नाही तर त्यासोबतीने प्रचंड वेदनाही येतात ज्यामुळे रुग्णाच्या जीवनाच्या गुणवत्तेमध्ये लक्षणीय घट दिसू लागते. पेनेक्समध्ये आमचे काम केवळ रुग्णांच्या वेदनांवर काम करणे यापुरतेच मर्यादित नसून, इथे त्यांचे जीवन अधिक सुखकर आणि कर्करोगाशी लढा अधिक सुसह्य व्हावा यासाठी योग्य तो सपोर्टही पुरविला जातो. कर्करोगासारख्या दुर्धर रोगासोबत लढणाऱ्या रुग्णांना परिपूर्ण जीवन जगण्यासाठी सक्षम बनविणे हेच आमचे ध्येय आहे.”
कर्करोगाच्या रूग्णांसाठी अनियंत्रित वेदना या एखाद्या चिवट विरोधकासारखे काम करतात. कर्करोगामुळे रुग्णांची होणारी शारीरिक आणि भावनिक ओढाताण अधिकच असह्य करण्यात हा विरोधक मोलाची भूमिका बजावतो. या वेदना एकतर आजारपणामुळे किंवा उपचारपद्धतींमुळे निर्माण होतात. भयंकर त्रासदायक असलेल्या या वेदनांचा जोर इतका वाढतो की रुग्णाच्या रोजच्या जगण्याचा दर्जा तर खालावतोच, त्याचबरोबर उपचारांमध्येही मोठा अडथळा निर्माण होतो. या वेदना फक्त शारीरिक स्वरूपापुरत्या मर्यादित न राहता, रुग्णाचे मानसिक खच्चीकरण करतात, ज्यामुळे रुग्णाची प्रतिकूल परिस्थितीवर मात करणारी लवचिकता आणि स्वातंत्र्य नष्ट होण्याच्या मार्गावर येते.
पेनेक्स क्लिनिकमध्ये एक समग्र दृष्टीकोन वापरून अत्याधुनिक पद्धतीने वेदना व्यवस्थापन धोरणे राबविली जातात. यामध्ये इंटरव्हेंशनल पेन मॅनेजमेंट म्हणजेच अपेक्षित बदल घडवणारे वेदना व्यवस्थापन, न्यूरोलिसिस प्रक्रिया आणि पॅलिएटिव्ह केअर म्हणजेच आजाराची तीव्रता काळजीपूर्वक कमी करणाऱ्या तंत्राचा समावेश होतो.
इंटरव्हेंशनल पेन मॅनेजमेंट या प्रक्रियेत अगदी लहानशा शस्त्रक्रियेच्या माध्यमातून वेदनेवर अचूक निदान आणि उपचार केले जातात. यामुळे रुग्णाला अत्यंत गरजेचा असलेला दिलासा लवकर मिळतो. न्युरोलिसिस प्रक्रियांमध्ये रासायनिक किंवा थर्मल एजंट्सचा वापर करून वेदनांचे वहन करणाऱ्या मज्जातंतूंना व्यवस्थित निवडून त्यांच्यावर उपचार केले जातात. त्यामुळे वेदनांपासून प्रभावी आणि दीर्घकाळ सुटका होते. पॅलिएटिव्ह केअरमुळे उपचारपद्धत आणखीनच सर्वसमावेशक होते. त्यायोगे फक्त शारीरिक वेदनाच दूर केली जात नाही तर भावनिक आणि मनोसामाजिक परिणामांचाही विचार करून उपचार केले जातात, त्यामुळे रुग्णांचे सर्वांगीण कल्याण होणे सहजसाध्य होते