Devendra Fadnavis – पंकजा व धनंजय मुंडे यांनी यापुढेही असेच एकत्र राहावे. आम्ही तिन्ही पक्षांची ताकद या दोघा भावंडांमागे उभी करू. यामुळे परळी व बीडचेच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राचे कल्याण होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी परळीत आयोजित शासन आपल्या दारी कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला.
फडणवीस यावेळी पुढे बोलताना म्हणाले की, आम्ही तिघे एकत्र आलो आहोत. आम्हाला राज्याचा विकास करायचा आहे. पाच राज्यांच्या निवडणुकीचा निकाला लागला. आम्ही जेथे गेलो तिथे चांगला निकाल लागला. आम्ही बाहेर गेल्यामुळे विरोधक आमच्यावर टीका करतात.
दुसऱ्या राज्यात कशाला प्रचाराला गेला म्हणतात. पण त्यांना कुणी शेजारच्या घरी देखील बोलावत नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आम्ही इतर राज्यात जात असल्यामुळे त्यांचे पोट दुखत असते, असे फडणवीस विरोधकांवर विशेषतः उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना म्हणाले.
फडणवीस म्हणाले की, महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत १० लाख महिलांना घर दिले जात आहे. आशा वर्कर्सच्या पगारामध्ये वाढ करण्यात आली आहे. वैद्यनाथ विकास कामासाठी मी स्वत: पंतप्रधान मोदी यांच्याकडे जाऊन आराखडा मंजूर करुन आणणार आहे.
शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा यासाठी सरकारचे प्रयत्न आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत लवकरत केंद्र सरकारसोबत बैठक घेणार आहोत. सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणण्यात आल्या आहेत. मराठवाड्याला आम्हाला दुष्काळमुक्त करायचे आहे. मराठवाड्याला हक्काचं पाणी मिळवून देणार आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
शेतकऱ्यांसाठी सौर कृषी वाहिनी योजना
सोयाबीन, कापूस यांचा भाव वाढला पाहिजे यासाठी केंद्राशीही बोलणी सुरु आहेत. मला आणखी एका गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे. आम्हाला दिवसा १२ तास वीज द्या ही शेतकऱ्यांची मागणी असते. आपण वर्षानुवर्षे शेतकऱ्याला रात्री आणि दिवसा वीज देतो. मात्र आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरु केली. या योजनेच्या अंतर्गत दिवसा १२ तास अखंडित वीज देण्याचा निर्णय आपण घेतला आहे.
पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
परळीच्या विकासासाठी कोणत्याही मंचावर जाण्याची तयारी आहे, हे दाखवण्यासाठी आले. मी जात धर्म पाहत नाही. कोणत्याही पक्षाच्या लोकांना त्रास दिला नाही. द्वेष मनात ठेवला नाही. या जिल्ह्याचे कर्ज माझ्या डोक्यावर आहे. धनंजयच्याही डोक्यावर आहे. विकास तुमच्या पदरात देणे हे आमचे कर्तव्य आहे. आज परळीच्या विकासासाठी मी सर्वांच्या खांद्याला खांदा लावून काम करेल. वंचिताचा वाली बनण्यासाठी खांद्याला खांदा लावून काम करू, असे पंकजा यांनी यावेळी म्हटले आहे.
माझीच नजर न लागो- धनंजय मुंडे
यावेळी धनंजय मुंडे यांनीही जोरदार भाषण करताना पंकजा यांचे तोंडभरून कौतुक केले. जीवनात अनेक सभा केल्या. अनेक कार्यक्रम केले. पण शासन आपल्या दारी निमित्ताने पहिल्यांदा असा कार्यक्रम होत आहे. तोंडातून शब्द फुटू नये इतकी ही गर्दी आहे. माझीच नजर न लागो माझ्या वैभवाला , असे म्हणत जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही एकत्र काम करणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.