मुंबई – इंडिया या विरोधी पक्षांच्या आघाडीत सहभागी होण्याची इच्छा आम्ही दर्शवली. त्याविषयीचे पत्र कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पाठवले. पण, अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी सोमवारी केला.
इंडियामध्ये सहभागी होण्याबाबतचा कुठला प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीने दिला नसल्याची वक्तव्ये कॉंग्रेसच्या गोटातून करण्यात आली. त्यामुळे मी 1 सप्टेंबरला पत्र पाठवले, अशी माहिती आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आणखी काही दिवस कॉंग्रेसच्या प्रतिसादाची प्रतीक्षा करू. प्रसंगी महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्व 48 जागा लढवण्याची तयारी आम्ही सुरू केली आहे. लवकरच मी आणि माझे सहकारी राज्यव्यापी दौरा सुरू करू. राज्याच्या विविध भागांत आमच्या सभा होतील.
पहिली सभा लातूरमध्ये होईल, असेही त्यांनी नमूद केले. शिवसेनेचा ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीने याआधीच युती जाहीर केली. त्याविषयी विचारल्यावर ती युती कायम असल्याचे उत्तर आंबेडकर यांनी दिले.
अद्याप महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये जागावाटपाची बोलणी झालेली नाही. त्यामुळे जागावाटपाविषयी अजूनही अस्पष्टता असल्याचे ते म्हणाले.