मुंबई – आशियाई बिलियर्डस स्पर्धेत भारताचा स्टार खेळाडू पंकज अडवाणी याने आठवे विक्रमी विजेतेपद साकार केले. राष्ट्रकुल व आशियाई क्रीडा स्पर्धेतही बिलियर्डसचा समावेश होणे गरजेचे आहे, तरच नवी गुणवत्ता गवसेल, असेही पंकजने या विजेतेपदानंतर बोलताना सांगितले.
यंदाच्या विजेतेपदासह पंकजचे हे विक्रमी 12 वे आशियाई आणि तब्बल 41 वे आंतरराष्ट्रीय विजेतेपद ठरले आहे. या वर्षांच्या सुरुवातीला पंकजला करोनाची बाधा झाली होती. मात्र, त्यातून बाहेर येत त्याने मार्च महिन्यात दोहा येथे सलग तीन स्पर्धात भारताचे प्रतिनिधित्व केले.
त्याने आशियाई स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताच्याच ध्रुव सितवालाला सहा फ्रेममध्ये पराभूत करत विजेतेपदाला गवसणी घातली.या वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धा आणि राष्ट्रकुल स्पर्धाही होणार असून बिलियर्डस खेळ या स्पर्धाचा भाग नाही. यायबाबत त्याने नाराजी व्यक्त केली नसली तरीही या खेळाला मोठ्या स्तरावरही समाविष्ट होण्याची गरज मात्र, त्याने बोलून दाखवली.
पंकजने याआधी आशियाई क्रीडा स्पर्धेत दोन पदके (2006 आणि 2010) मिळवली आहेत. 2010 सालानंतर बिलियर्ड हा खेळ आशियाई स्पर्धेचा भाग नसून 2030 साली या खेळाचे या स्पर्धेत पुनरागमन होणार आहे.