पिंपरी, दि. 4 – जोरजोरात भुंकणे आणि परिसरातून जाताना गुरगुरणाऱ्या श्वानांची मोशी परिसरात दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन रात्री अपरात्री रस्त्याने जावे लागत आहे. श्वानांचा कोणत्या क्षणी हल्ला होईल, हे सांगता येत नसल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. या भटक्या कुत्र्यांचा वेळीच बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
सध्या मोशीचा परिसर उच्चभ्रू वसाहतींचा अविभाज्य घटक बनत चालला आहे. रात्री नऊ ते दहाच्या समारास फेरफटका मारण्यासाठी नागरिक घराबाहेर पडतात. त्यांना अशा भटक्या श्वानांचा सामना करावा लागत आहे. आदर्शनगर, गंधर्वनगरी, तापकीरनगर परिसरात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. जवळच कचरा डेपो असल्यामुळे त्याठिकाणी कुत्री काहीतरी खाण्याच्या शोधात जमा होतात. त्यामध्ये पिसाळलेल्या कुत्र्यांचाही वावर असतो. काही दिवसांपूर्वी एक ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलाला श्वानांनी चावा घेतला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण असून लहान मुलांना व वृद्ध नागरिकांना घराबाहेर पडणे धोक्याचे झाले आहे.
स्थानिकांचा आंदोलनाचा इशारा
या भागातील सर्व श्वानांना पकडून त्यांचे रेबीज लसीकरण आणि नसबंदी करण्याची गरज आहे. जर येत्या काही दिवसांत भटक्या श्वानांचा प्रश्न निकाली निघाला नाही, तर तीव्र आंदोलनाचा इशारा नागरिकांकडून देण्यात आला आहे. यामुळे समस्येवर लवकरच तोडगा काढून नागरिकांच्या जिवाचा धोका कमी करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत तापकीर, गणेश आंबेकर, किसन यादव, चिंतामणी हिंगे, दशरथ थोरात आदींनी केली आहे.