पाचगणी – जावळी तालुक्याच्या अस्मितेचा प्रश्न झालेला आणि 13 वर्षापासून रखडलेले बोंडारवाडी धरण एक टीएमसी इतक्या क्षमतेचेच होणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दरे तांब येथे आयोजीत कार्यक्रमात दिली.
ते म्हणाले, दुर्गम जावळीच्या कष्टकरी शेतकऱ्याच्या अठरा विश्व दारिद्र्याला पर्जन्यमान भरपुर असून देखील पाणी अडवलं नसल्यामुळे मुंबईसारख्या ठिकाणी विस्थापित होण्याचं दु:ख भोगायला आले आहे. दुर्गम भागातील शेतकरी जगायला हवा, याकरीता त्याच्या भागातील शेती प्रथमता जगवायला हवी. या शेतीकरीता पाण्याची सोय होणे काळाची गरज आहे.
यासर्व बाबींचा विचार करुनच मुख्यमंत्री म्हणून माझ्या जावळीच्या जनतेला माझा शब्द आहे बोंडारवाडी धरण एक टीएमसी क्षमतेचे होणार,अशी ग्वाही शिंदे यांनी दिली. यावेळी सहसंपर्कप्रमुख एकनाथ ओंबळे यांनी बोंडारवाडी घरणाबद्दल मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याची मागणी निवेदनाद्वारे बोडांरवाडी कृती समितीकडून करण्यात आली. यावेळी धरण कृती समितीचे आदिनाथ ओंबळे, वैभव ओंबळे, श्रीरंग बैलकर, बजरंग चौधरी, महेंद्र चिकणे, संपत कासुर्डे, महादेव ओंबळे, प्रशांत जुनघरे आदी उपस्थित होते.